कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी पोलिसांची मदत घ्या

आरोग्य मंत्र्यांच्या सूचना ; जिल्ह्यात प्रमाण कमी

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात स्वॅब टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण फार कमी आहे. ते वाढविण्यासाठी संपर्कात आलेल्यांच्या चाचणीसाठी वेळ प्रसंगी पोलिस, तहसीलदार, बिडीओ आदींची मदत घ्या. तरच बाधित निश्‍चित होऊन त्यांच्यावर उपचार होतील, संसर्ग रोखता येईल, अशा कडक सूचना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा प्रशासनाला व्हिसीमध्ये दिल्या.

रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये आला आहे. कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि पॉझिटिव्ह रेटच्या अनुषंगाने ही कार्यवाही झाली आहे. मात्र जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला याबाबत शंका आहे. पॉझिटिव्ह रेट 20 टक्केच्यावर गेल्यास जिल्हा रेड झोनमध्ये जातो, असा निकष आहे. तसेच किती बाधित दाखल झाले, किती ऑक्सिजन आणि किती व्हेंटिलेटरवर आहे याचाही सारासार विचार होतो. रत्नागिरी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट 17.43 टक्के आहे. जिल्ह्याचा ग्रोथ रेट देखील 2.4 टक्के आहे. चुकीच्या पद्धतीने जिल्ह्याची माहिती पोर्टलवर अपलोट झाल्याची शंका आहे. त्याअनुषंगाने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन काम करत आहे. जिल्हा रेड झोनमध्ये गेल्यानंतर तत्काळ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सायंकाळी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागाची व्हीसी घेतली. त्यांनी यंत्रणेला कडक सूचना दिल्या. जिल्ह्यात स्वॅब टेस्टींगचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. एखादा पॉझिटिव्ह आला तर त्याच्या संपर्कात आलेल्या 20 लोकांचा शोध घेऊन (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) चाचणी घेणे अनिवार्य आहे. मात्र रत्नागिरीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे हे प्रमाण 8 ते 10 सुद्धा नाही.त्यामुळे बाधितांवर नियंत्रण ठेवणे कठीण बनले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी वेळप्रसंगी पोलिस बंदोबस्त घ्या, एका बाधिताच्या संपर्कातील 15 ते 20 जणांना शोधून त्यांच्या चाचण्या करा, असे आदेश राजेश टोपे यांनी दिले.