तोक्ते वादळ रविवारी सायंकाळी रत्नागिरीत धडकणार

रत्नागिरी:- जिल्ह्यात रविवारी सकाळी तोक्ते वादळ राजापूरपासून किनार्‍यावर समांतर जाणार असून काही गावांतील नागरिकांना स्थलांतरीत केले जाणार आहे. काही ठिकाणी स्थलांतर सुरु करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. नागरिकांना आवाहन केले जात असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. पुर्णगडजवळ दुपारी 1, रत्नागिरी सायंकाळी 4 वाजेपर्यत, नेवरे सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास, दापोली सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यत वादळ पोहचण्याची शक्यता आहे. ताशी 40 ते 90 किमी प्रमाणे वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी समुद्र किनाऱ्याशेजारी असलेल्या पाच तालुक्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

राजापूर तालुक्यातील 22 गावे, रत्नागिरी तालुक्यातील 25 गावे, गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्यातील गावांचा यात समावेश असून किनारपट्टीवरील सुमारे 10 किमीपर्यंतच्या भागात जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना सतर्क करण्यात आले आहे. बाहेरुन आलेल्या खलाशांना शाळांमध्ये स्थलांतरीत केले जाणार आहे. एनडीआरएफचे टीम आलेली नसून, गरज पडली तर बोलावली जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.