निवळीत ब्रेक फेल झालेल्या ट्रकला अपघात  होऊन चालक ठार

रत्नागिरी:- धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल होऊन मोठा अपघात झाला. निवळी येथे मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक श्रीराम शशिकांत प्रसादे (५२, रा. देवरूख) याचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी ट्रक चालक श्रीराम शशिकांत प्रसादे हे ट्रक क्रमांक (एमएच ०४, ईवाय ९२०३) घेऊन निवळी येथील मासेबाव गोडावूनमधील धान्य घेऊन संगमेश्वरकडे जात होते. निवळी येथील दत्तमंदिर येथील वळणात आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. गाडीवर नियंत्रण मिळवता आल्याने गाडी समोरील डोंगरावर जाऊन आदळली. त्यामध्ये गाडीच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला.

या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कांबळे, अजय कांबळे व संजय झगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला.