साळवी स्टॉप ते कुवारबाव महामार्गालगत बांधकामांवर अखेर हातोडा 

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप ते कुवारबाव महामार्गावर अनधिकृत बांधकामांचे जाळे पसरले होते.  गेल्या काही महिन्यात अशी अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विशेष म्हणजे या अनधिकृत बांधकाम असूनही त्यांना ग्रामपंचायतीच्या पावत्या दिल्या जात होत्या. या प्रश्नी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या आदेशानुसार शुक्रवारी अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू झाली आहे 

 महामार्ग लगतची ही बांधकामे हटवली जात नव्हती. नुकत्याच झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ना. उदय सामंत यांनी  कोल्हापूरहून आलेल्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.  ही बांधकामे जर पाडली नाहीत तर तुम्ही जबाबदार आहात असं समजून  थेट कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे शुक्रवारी संबंधित खात्याकडून कारवाईला सुरुवात झाली. यासाठी पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता.  सुरुवातीला सिंचन भवन पासुन ही अनधिकृत बांधकामे पाडण्यास सुरुवात झाली आहे. आता या कारवाईत ही सर्व अनधिकृत बांधकामे तोडली जाणार की नाही हे लवकरच स्पष्ट होणार आहे.