शहरातील अतिक्रमण विरोधात 1 डिसेंबरपासून मोहीम

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात वाढलेल्या टपऱ्या, अनधिकृत बांधकामे आणि फुटपाथ वरील गर्दी हटवण्यासाठी 1 डिसेंबर पासून खास मोहीम हाती घेण्यात येणार आहे. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेण्यात आला असून लवकरच रस्ते आणि फुटपाथ मोकळा श्वास घेण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी शहराचे प्रवेशद्वार असलेल्या साळवी स्टॉप
येथूनच अनधिकृत बांधकामाचे साम्राज्य उभे राहिले आहे. शहरातील प्रत्येक वार्डात अनधिकृत टपऱ्या आणि खोक्यांची संख्या वाढली आहे. राहुल पंडित नगराध्यक्ष असताना अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र यानंतर विषय बारगळला होता.

अनधिकृत टपऱ्यांमुळे शहराची अवस्था बकाल झाली असल्याने गुरुवारी झालेल्या सभेत अतिक्रमण हटाव बाबत सभागृहात चर्चा करण्यात आली. मंगळवार दिनांक 1 डिसेंबरपासून अनधिकृत खोके, टपऱ्या आणि अतिक्रमण करणाऱ्यावर नगरपरिषद कारवाई करणार असून हि कारवाई साळवी स्टॉपपासून सुरू होणार असल्याचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी सांगितले.

रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे नगरसेवक राजन शेट्ये यांनी अनधिकृत टपऱ्या आणि खोक्यांविरूध्द कारवाई करण्याची मागणी केली.बाजारपेठेतही अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले असल्याची तक्रार राजन शेट्ये यांनी मांडताच नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी अनधिकृत खोक्यांवर आणि फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. 1 डिसेंबरपासून साळवी स्टॉप येथून कारवाईची मोहिम सुरू होईल ज़र कारवाईत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी कुचराई केल्यास त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असा इशारा साळवी यांनी दिला. या कारवाईत कोणत्याही नगरसेवकांनी हस्तक्षेप करू नये. नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्यास त्यांची नावे जाहीर करा अशा सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.