आंबा, काजूला पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा योजनेचे कवच

 विमा उतरवण्यासाठी 30 नोव्हेंबरची मुदत 

रत्नागिरी:- बदलत्या हवामानामुळे कोकणचा हापूस संवेदनशील बनत आहे. गतवर्षी विमा उतरवलेल्या शंभर बागायतदारांना परतावा मिळाला होता. यंदासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ विमा आंबा व काजू या फळपिकासाठी लागू केली आहे. विमा उतरवण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत निश्‍चित करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

नैसगिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकर्‍यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकर्‍यांना नाविन्यपूर्ण सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पत पुरवठ्यात सातत्य राखणे आणि उत्पादनातील जोखमीपासून संरक्षण ही विमा योजनेची उद्दिष्टे आहेत. यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड कंपनीची नियुक्ती केली आहे. आंबा पिकासाठी अवेळी पाऊस झाल्यास 1 डिसेंबर ते 15 मे कालावधीकरीता शेतकर्‍यांना प्रति हेक्टर 7 हजार रुपये हप्ता भरावयाचा असून 1 लाख 40 हजाराचे विमा संरक्षण आहे. कमी तापमानासाठी 1 जानेवारी ते 15 मार्च तर जास्त तापमानासाठी 1 मार्च ते 15 मे कालावधी आहे. गारपिटीसाठी 1 फेब्रुवारी ते 31 मे या विमा संरक्षण कालावधीकरीता शेतकर्‍यांनी प्रति हेक्टर 2 हजार 333 रुपये हप्ता भरावयाचा आहे. त्यांना विमा संरक्षित रक्कम 46 हजार 667 रुपये आहे.  

काजूसाठी अवेळी पाऊस झाल्यास 1 डिसेंबर ते 15 मे कालावधी असून कमी तापमानासाठी 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी या विमा संरक्षण कालावधीकरीता प्रति हेक्टर 5 हजार रुपये हप्ता भरावयाचा आहे. याकरीता विमा संरक्षित रक्कम 1 लाख रुपये आहे. गारपिटीसाठी 1 जानेवारी ते 30 एप्रिल विमा संरक्षण कालावधी असून शेतकर्‍यांनी प्रति हेक्टर 1 हजार 667 रुपये हप्ता भरावयाचा आहे. त्यांना विमा संरक्षित रक्कम 33 हजार 333 रुपये आहे. गतवर्षी वार्‍यापासून होणार्‍या नुकसानीपोटी विमा संरक्षण देण्यात आले होते; मात्र यंदा तो निकष रद्द केला आहे.