रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील भातशेतीच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा

ना. उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे आदेश राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र उदय सामंत यांनी दोन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. 

परतीच्या पावसानं कोकणातील भातशेतीचं मोठं नुकसान झालं आहे. कापलेली भातशेती पाण्यात भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये यामुळे मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांमधील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा असे आदेश रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्ह्याधिकाऱ्यांना आपण दिले असल्याची माहिती  उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

तसेच विद्यापीठाच्या परिक्षांच्या तांत्रिक घोळाबाबत रश्मी करंदीकर यांच्यांशी चर्चा केलीय. पण, या साऱ्यामध्ये कोणताही विद्यार्थी परिक्षेविना राहणार नाही. कुणाचंही नुकसान होणार नाही अशी प्रतिक्रिया उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पुणे विद्यापीठांच्या परिक्षेदरम्यान झालेल्या घोळाबाबत विचारले असता ते रत्नागिरी येथे बोलत होते. जोपर्यंत शेवटच्या विद्यार्थ्याची परिक्षा होत नाही तोपर्यंत परिक्षा होतील असं सामंत यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

राज्यातील मंदिरं उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य भूमिका घेतील. त्यासाठी सारखी आंदोलनं करण्याची गरज नाही. राजकारण करताना ते मतांचं राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच शिवसेना प्रवक्ते सामंत यांनी भाजपच्या मंदिर उघडण्याच्या आंदोलनाबाबत दिली आहे.