जिल्ह्यात हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार अद्याप बंदच 

रत्नागिरी:- राज्य सरकारने 5 ऑक्टोबर पासून हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार उघडण्याला सशर्त परवानगी दिली असली तरी जिल्ह्यात अद्याप हॉटेल्स आणि बार बंदच आहेत. याबाबत हॉटेल्स चालक आज जिल्हा प्रशासनाची भेट घेणार आहेत. मा. जिल्हाधिकारी यांच्याकडून आज सूचना प्राप्त होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

 राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. अनलॉक ५ च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग होणार. कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे आहे का? हे तपासावे. उदा. शरीराचे तापमान, सर्दी, खोकला. लक्षणविरहीत ग्राहकांनाचं केवळ प्रवेश द्यावा. हॉटेल, रेस्टारंटमध्ये भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांची नोंदणी ठेवावी. कोणालाही सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे. ग्राहकांच्या परवानगीने त्यांची माहिती प्रशासनास पुरवावी. जेणेकरुन कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा तपास करणे सोपे होईल. कोणत्याही ग्राहकाला मास्कशिवाय प्रवेश देऊ नये. केवळ खाण्यासाठी मास्क काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रत्येक ग्राहकासाठी हँडसॅनिटायझर्सची सोय करण्यात यावी. शक्यतो पैसे हे डिजीटल पद्धतीने स्वीकारावे. वॉशरुम्स आणि हात धुण्याचा परीसर कायम तपासत रहावे. तिथे सातत्याने स्वच्छता ठेवावी. ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील संपर्क कमीत कमी ठेवावा. सर्व सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित असावे. एका ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये प्रवास करु शकणार नाही. दोन टेबलमध्ये सुरक्षित फुटांचे अंतर असणे गरजेचे. वेळोवेळी टेबल आणि हॉटेलच्या किचनची स्वच्छता होणे आवश्यक असेल. हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविडची चाचणी करणे आवश्यक असेल असे नियम बंधनकारक करण्यात आले.