नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना कारला अपघात; एक ठार

रत्नागिरी:- मालवण येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाणाऱ्या वाडकर कुटुंबीयांच्या इको कार मुंबई-गोवा महामार्गावरील चरवेली नजीक रस्त्यावरुन खाली उलटून झालेल्या अपघातात भगवान बाबाजी वाडकर( वय- 85, विक्रोळी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चालकासह अन्य दोन जण जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.       

आते बहिणीच्या पतीचे निधन झाल्याने त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वाडकर कुटुंबीय मुंबई येथून मालवण येथे निघाले होते. चालक सुनील भगवान वाडकर हे आपल्या ताब्यातील इको कार घेऊन मंगळवारी पहाटे विक्रोळी येथून आपल्या समवेत वडील भगवान वाडकर,भाऊ अनिल वाडकर, कृष्‍णा रामचंद्र वाडकर यांना घेऊन निघाले होते. दुपारी बाराच्या सुमारास गाडी हातखंबा नजिकच्या चरवेली येथील वळणावर आली असता सुनील वाडकर यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या खाली दीडशे फूट उलटली.गाडीने दोन पलटी मारल्याने यामध्ये भगवान वाडकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनील वाडकर, अनिल वाडकर, कृष्णा वाडकर हे जखमी  झाले. 

अपघाताची माहिती मिळताच हातखंबा पोलीस मदत वाहतूक केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुरेश कदम, पोलीस हवालदार संतोष कांबळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.मृत झालेल्या भगवान वाडकर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्छेदन करून सायंकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघातप्रकरणी चालकांविरोधात ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.