मेर्वीत बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी

रत्नागिरी:- तालुक्यातील पावस मेर्वी येथे बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
 

पावस परिसरात यापूर्वी देखील बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. शनिवारी सकाळी पुन्हा बिबट्याने शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला केला. जनार्दन काशिनाथ चंदूरकर (वय -55रा. मेर्वी जांभूळआडी) असे शेतकऱ्याचे नाव आहे. सकाळी 6.30 ते गुरे घेऊन शेतात गेले असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या मानेवर बिबट्याच्या नखांचे तीव्र व्रण उठले आहेत. स्वतःची सुटका करून घेत त्यांनी गाव गाठले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.