जिल्ह्याला पावसाने झोडपले; चिपळूण, संगमेश्‍वरसह राजापूरात पुर परिस्थिती

रत्नागिरी:- सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने झोडपून काढले. चिपळूण, संगमेश्‍वरसह राजापूरात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. वाशिष्ठी नदीच्या पुराचे पाणी चिपळूण बाजारपेठेत घुसले. दुपारनंतर चिपळूणातील पूर ओसरला. पुरामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे गावाकडे येणार्‍या चाकरमान्यांची पंचाईत झाली होती. पावसाबरोबरच वेगवान वार्‍यांचीही दहशत रत्नागिरीकरांना जाणवत होती.

शनिवारी सायंकळपासून वेगवान वार्‍यासह मुसळधार पावसाला सुरवात झाली. पावसाचा जोर रात्रभर होता. रविवारी (ता. 16) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 97.24 मिमी पाऊस झाला. त्यात मंडणगड 81.20,  दापोली 62.90,  खेड 133.60,   गुहागर 99.30, चिपळूण  128, संगमेश्वर 105.10,  रत्नागिरी 82.60,  लांजा, 87.20,  राजापूर 85.30 मिमी नोंद झाली. रविवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. सर्वाधिक पावसाचा तडाखा चिपळूण शहराला बसला. वाशिष्ठी नदीला आलेल्या पुराचे पाणी मध्यरात्री शहरात शिरले. चिपळूण शहरातील मध्यवर्ती बसस्थानकपर्यंत पाणी शिरले होते. त्यामुळे बसस्थानकातील सर्व एसटीच्या गाड्या बाहेर काढण्यात आल्या. वडनाका, चिंचनाका, पेठमाप अशा भागात मोठ्याप्रमाणात पाणी घुसले होत. त्यामुळे व्यापार्‍यांचे, नागरिकांचे नुकसान झाले. वाशिष्ठीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथील पूल शनिवार रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. रविवारी दुपारी पूल वाहतुकीसाठी सुरु झाला. वाहतूक गुहागर बायपास रोडकडून वळविण्यात आली होती. महामार्गावर वाहनांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. चिपळूणातील पूर परिस्थिती दुपारनंतर ओसरली. सखल भागात पाणी साचले होते.

संगमेश्‍वर तालुक्यातील गडनदीलाही आलेल्या पुरामुळे माखजन बाजारपेठेत पाणी घुसले होते. यंदाच्या वर्षातील ही दुसरी वेळ आहे. मुसळधार पावसाचा जोर कायम राहीला तर गडनदी किनारी असलेल्या गावांना पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. राजापूरमधील अर्जुना नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाणी जवाहर चौकात शिरण्याची शक्यता आहे. सायंकाळपर्यंत पुराचे पाणी दुकानांपर्यंत आले होते. त्यामुळे व्यापार्‍यांनी साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत केले. रत्नागिरी तालुक्यातील काजळी नदीही दुथडी भरुन वाहत आहे. पावसाचा जोर रात्रभर कायम राहीला तर पात्र सोडून पाणी किनार्‍यावरील भागात घुसण्याची शक्यता आहे. आठ दिवसांपुर्वी काजळीच्या पुरामुळे सहा गावे बाधित झाली होती. लांजा, खेड, गुहागर, मंडणगडसह दापोली तालुक्यातही मुसळधार पावसासह वेगवान वारे वाहत आहे.

पावसाचा जोर सोमवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने किनारी भागातील ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सुचना केल्या आहेत. वेगवान वार्‍यामुळे समुद्र खवळलेला असून मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असे मत्स्य विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.