2 जूनपासून रत्नागिरी जिल्ह्यात आठवड्याचा कडक लाॅकडाऊन; दुधाची देखील होम डिलिव्हरी

रत्नागिरी:- कोरोना आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 जून पासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. सात दिवसाच्या कालावधीत दूध देखील घरपोच मागवावे लागणार असून आरोग्य सेवा वगळता अन्य सर्व सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. 

जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोव्हीड-19 रुग्णांच्या पॉझिटीव्हीटीचे प्रमाण 20% असून 67% च्या वरती ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्याप्त आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची साखळी तुटण्यासाठी जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती विचारात घेता, रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कोरोना बाधित रुग्णांची साखळी तोडण्याच्या अनुषंगाने दिनांक 2 जून, 2021 रोजीचे सकाळी 7 वाजले पासून ते दिनांक 8 जून, 2021 रोजीचे सकाळी 7 वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

या कालावधीत मेडीकल दुकाने, आरोग्य विषयक सेवा व आरोग्य विषयक आस्थापना पुर्णवेळ सुरु राहतील. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे दुकान / आस्थापना पुर्णतः बंद राहतील. दुध व किराणा मालाची दुकाने यांना केवळ घरपोच सेवा सकाळी 7.00 ते 11.00 या वेळेत पुरविता येईल.

रत्नागिरी जिल्ह्याच्या सिमा अन्य जिल्ह्यातून प्रवेश करणेस किंवा अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस बंद करणेत येत आहेत. तथापि, केवळ नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी वैदयकिय उपचारासाठी व कोव्हीड-19 व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक सेवा किंवा निकडीच्या आणिबाणीच्या प्रसंगी रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश करणेस किंवा रत्नागिरी जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात प्रवास करणेस मुभा राहील.
 

जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस 48 तास अगोदर केलेली कोव्हीड-19 निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र सोबत असल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. मालवाहतुकीसाठी कोणतेही बंधन असणार नाही. तथापि, अशी मालवाहतुक केवळ दुकानापर्यंत आस्थापनेपर्यंत माल वितरण करणेपुरती मर्यादित राहील. कोणत्याही ग्राहकास थेट माल पुरविता येणार नाही. याबाबत शर्तभंग आढळल्यास अशा मालवाहतुकदाराची सेवा कोव्हीड-19 चा प्रादुर्भाव आटोक्यात येईपर्यंत बंद करणेत येईल. शेतीच्या पेरणीचा हंगाम विचारात घेता कृषिविषयक संलग्न सर्व दुकाने सकाळी 7.00 ते दुपारी 2.00 या काळात सुरु ठेवणेस मुभा राहील.

वरील आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) लागू राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.