५७ कॅमेऱ्यातून रत्नागिरी शहरावर वॉच

मुख्यालयाजवळ नियंत्रण कक्ष; बारीकसारीक हालचाली कैद

रत्नागिरी:- संपूर्ण रत्नागिरी शहर आणि महत्वाच्या भागांवर पोलिसांचा डोळा आहे. एचडी, बुलेट, एएनपीआर अशा अत्याधुनिक ५७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे शहरामध्ये बसले आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या बाजूला नव्या इमारतीमध्ये त्याचे नियंत्रण कक्ष सुरू झाले आहे. अपघात, गुन्हेगारी, गैरप्रकार, बेशिस्त वाहनपार्किंग, वाहतुकीला होणारा अडथळा, अगदी दिवसा-रात्रीच्या बारीकसारीक हालचालींवर या नियंत्रण कक्षातून २४ तास पोलिसांचा वॉच शहरावर आहे.

राज्यातील औरंगाबाद शहरामध्ये सीसीटीव्हीचा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर रत्नागिरी शहरातही प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्हीचा हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या प्रयत्नातून हा १ कोटीचा प्रकल्प सुरू झाला आहे. यामध्ये शहरांतील सर्व प्रवेशद्वारांपासून सावर्जनिक ठिकाणे, महत्वाची ठिकाणे, किनारे, बंदर, जेटी, एसटी बसस्थानक, काही संवेदनशील भाग आदी ठिकाणी ५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनी तत्कालीन कोकण परिक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांच्या हस्ते या प्रकल्पाचा आरंभ करण्यात आला.
ई-निविदा प्रक्रिया करून मुंबईतील कंपनीने या कामाचा ठेका घेतला आहे. हे काम पूर्ण झाले असून, या ५७ सीसीटीव्हीचे नियंत्रण पोलिस मुख्यालयातील नवीन इमारतीच्या कक्षात सुरू झाले आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी यामध्ये पुढाकार घेऊन या कामाला गती दिली. आज हे काम पूर्ण झाले आहे. ५७ सीसीटीव्हीचे मॉनिटर नियंत्रण कक्षात आहेत. तेथील कर्मचारी २४ तास या सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण शहर आणि परिसरावर नजर ठेवून आहेत. कुठे अपघात झाला तरी कोणाची चूक आहे, हे कळते. संशयास्पद हालचाली, गुन्हेगारी, गैरप्रकार, बेशिस्त वाहनपार्किंग, वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्यांवर पोलिसांचे लक्ष आहे. त्यानंतर अगदी दिवसा आणि रात्रीच्या बारीकसारीक हालचालींवर पोलिसांचे लक्ष आहे. यापूर्वी देखील खून, चोऱ्या, मारामारी आदी गुन्ह्यांमध्ये सीसीटीव्ही फुटेजचा पोलिस तपासात फायदा झाला आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारी, गैरप्रकारांवर नियंत्रण राहणार आहे.