रत्नागिरी:- कडाक्याची थंडी, अधूनमधुन होणारी हिमवृष्टी, दिड फुटाच्या पायवाटेवरुन कडक झालेल्या बर्फावरुन पाय घसरण्याची भिती अशा परिस्थितीचा सामना करत रत्नागिरीतील 25 जणांनी रत्नदुर्ग माउंटेनिअर्सच्या मार्गदर्शनाखाली हिमालयीन बर्फाच्या रांगामधील उत्तराखंड येथील बेदनी बुग्याल हे 12 हजार 500 फुटाचे शिखर सर केले. 16 वर्षांपासून ते 54 वर्षांपर्यंतच्या प्रौढांपर्यंतचा समावेश असलेल्या रत्नागिरीकरांनी बर्फाच्छादीत प्रदेशातील तिन दिवसांचा थरार अनुभवला.
रत्नदुर्ग माउंटेनिअर्सचे अध्यक्ष वीरेंद्र वणजू, फिल्ड इन्चार्ज गणेश चौघुले, ट्रेक लीडर हर्ष जैन यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीतील 25 जणांचा ट्रेक उत्तराखंड येथील वान गावामधून 8 एप्रिलला सुरु झाला. बुग्याल हा ट्रेक म्हणजे नुसता बेस कॅम्प नाही, तर या ट्रेकमध्ये थेट शिखरावर जाऊन पोहोचतो. या मार्गावर ज्यावेळी बर्फ नसतो, त्या मोसमात या ट्रेकचे आयोजन केले जाते. बर्फ असताना या वाटा खडतर बनतात. मात्र नेमका बर्फ नसताना आखलेल्या या मोहिमेवर अचानकपणे बफवृष्टी झाली आणि रत्नदुर्गचा हा ट्रेक खडतर झाला. मात्र ग्रुपमधील सर्वांनी धाडसाने ट्रेक पुर्ण करायचा निर्णय घेतला.
तिन दिवसांचा थरारक प्रवास प्रथमच बर्फाच्छादित प्रदेशात ट्रेक करणार्या विरेंद्र वणजू यांनी सांगितला. 8 एप्रिलला पहिल्या दिवशी सकाळी अली बुग्यालकडे सर्वांनी कुच केले. गार वारा आणि कडाक्याची थंडी जाडजूड कपड्याच्या तिन थरातूनही जाणवत होती. दुपारी 4 वाजता बेस कॅम्पवर सर्व पोचले. दुसर्या दिवशी सकाळी 8 वाजता चालायला सुरवात झाली. दुपारी 2 वाजता निवासाच्या ठिकाणी सर्व पोचले. टेंटमध्ये विश्रांती घेत असतानाच हिमवर्षावाला सुरवात झाली. सुमारे तासानंतर हिम वर्षाव थांबला. बाहेर येऊन पाहिल्यानंतर आजूबाजूचा परिसर, डोंगर सर्वच पांढर्या बर्फाच्या दुलईत झाकले गेल्याचे दिसले. नजर फिरवू तिकडे बर्फच बर्फ होता. तिसर्या दिवशी सकाळी खडतर अशा बेदनी बुग्याल शिखराकडे वाटचाल सुरु झाली. बर्फ साचल्यामुळे चालताना प्रचंड त्रास होत होता. सहा इंचाहून अधिक खोल पाय जात होता. तेवढा तो उचलून दुसरे पाऊल टाकावे लागत होते. सुमारे चार किलोमीटर अंतर पार करुन केल्यानंतर अत्यंत खडतर अशी वाट सुरु झाली. कडक बर्फावरुन चालताना पाय घसरण्याची भिती होती. दिड फुटाची पायवाट असलेल्या या परिसरात पाय घसरला की खोल दरीतच! या परिस्थितीमध्येही सर्वांनी पाऊण किलोमीटरचा चढ चढत शिखर गाठले. ट्रेकसाठी दिलेल्या एका काठीचा आधार घेत सर्वजण चालत होते. उंचीवर गेल्यानंतर आक्सीजन कमी असल्यामुळे एकाला थोडा त्रास झाला. पण वेळीच उपाय करण्यात आले. परतीचा प्रवास दोन दिवसांचा होता.
बदललेला ऋतु जरी खडतर असला तरी या बर्फातील घेतलेला अनुभव आणि निसर्ग सौदर्य आयुष्यात विसरणे कठीण आहे; बर्याच जणांना ट्रेकचा अनुभव नव्हता. तरीही कठीण वातावरणात हा ट्रेक पूर्ण केला. ते पाच दिवस अविस्मरणीय आहेत.- विरेंद्र वणजू, अध्यक्ष, रत्नदुर्ग