रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा तिठा येथील बाबल धाब्यानजिक ३५ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवार २ मार्च रोजी सायंकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातातील तरुणाचा पाय तुटला असून अज्ञात वाहन चालकाने जोरदार धडक देऊन तेथून पळ काढल्याचे वृत्त आहे.
या अपघातातील तरुणाचे प्रशांत होरंबे ( वय ३५ राहणार पानवळ) असे नाव आहे. प्रवीण होरंबे हा सायंकाळी ७ च्या सुमारास भोके रस्त्याने जात होता. ईश्वर धाबा ते शांती धाबा या भागातील रस्ता पूर्ण खडबडीत असल्यामुळे चौपदरीकरणाची एक लेन सुरू करण्यात आली आहे. या काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावरुन वाहने भरधाव वेगाने जात असतात. प्रशांत होरंबे हा तरुण गुरुवारी ( 2 मार्च) घरी जात असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. सदर वाहनाची धडक इतकी जोरदार होती की, प्रशांतच्या पायाचे जाग्यावरच दोन तुकडे झाले. ही धडक चार चाकी वाहनाने दिली असल्याचे प्रत्यक्षदर्शनी पाहिलेल्या नागरीकांकडून सांगण्यात आले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेची माहिती जगतगुरु नरेंद्रचार्य महाराज नाणिज संस्थानच्या रुग्णवाहिकेचे चालक धनेश केतकर यांना देण्यात आली. काही मिनिटात केतकर रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.