सोमेश्वर प्राणघातक हल्ला; सातजणांना अटक

रत्नागिरी:- सोमेश्वर गावात राजकीय वादातून दीपक उर्फ बाब्या मयेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी सोमेश्वरमधील सात जणांना ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. त्यांना सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

रवींद्र उर्फ रवी मयेकर या तरुणाची निघृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचा वाद पुन्हा सोमेश्वर गावात उफाळून आला आहे. हत्येमध्ये शिक्षा झाल्याच्या रागातून रविवारी रुपेश मयेकरसह तिघांनी हत्या झालेल्या कै . रवी मयेकर यांच्या पुतण्याला बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थनाकात गुन्हा दाखल झालेला असतानाच सोमवारी दुपारी विरोधी गटातील अक्षय प्रकाश मयेकर, प्रथमेश सुभाष बिडू, सुरज प्रकाश मयेकर, निलेश अनंत मयेकर, आशिष अनंत मयेकर या पाच जणांनी दीपक उर्फ बाब्या मयेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

हल्ला केल्यानंतर या पाचजणांसह त्यांना पळून जाण्यास मदत करणारे अन्य दोघेजण गायब झाले होते. ग्रामीण पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज भोसले यांनी त्यांच्या टिमच्या मदतीने सातजणांना अटक केली आहे. त्यामध्ये अक्षय प्रकाश मयेकर, प्रथमेश सुभाष बिडू, सुरज प्रकाश मयेकर, निलेश अनंत मयेकर, आशिष अनंत मयेकर, स्मितेश बोरकर, सुरज नांदिवडेकर यांचा समावेश आहे.