रत्नागिरी:- जिल्ह्यात लवकरच दहा हजार कोटींचा उद्योग उभारण्यात येणार आहे. सिंगापूर येथील एप्रिल एशिया कंपनी रत्नागिरीत हा प्रकल्प उभारण्यास इच्छुक आहे. उच्च दर्जाचे टिशू बनविणारी ही कंपनी असून हे टिशू कंपनी निर्यात करते. त्यासाठी किनारपट्टी भागात सुमारे २ हजार एकर जागा कंपनीला अपेक्षित आहे. या उद्योगात कंपनी १० हजार कोटीची गुंतवणुक करण्यास तयार आहे. यामुळे रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला.
जिल्ह्यात मोठया प्रमाणात नवीन उद्योग येण्यास इच्छुक आहेत. त्यामध्ये कोकाकोला कंपनी, रेल्वे डबे
बनविणारा कारखाना, पेपर मिल, आदी कारखाने प्रस्तावित आहेत. या कारखान्यांमुळे जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रामध्ये चांगली भर पडणार आहे. जिल्ह्याच्या सागरी किनाऱ्याचा आयात-निर्यादीच्यादृष्टीने मोठा फायदा होणार आहे. कच्चा माल आणण्यास सोपे जात असल्याने जिल्ह्याच्या किनारपट्टीजवळच्या जागांना मोठी मागणी आहे. जिल्ह्यातील सहाही एमयाडीसींमधील जागा शिल्लक नसल्याने नव्या उद्योगांसाठी ही एक अडचण निर्माण झाली आहे. परंतु काही नव्या एमआयडीसीमध्ये जागा उपलब्ध झाल्या आहेत. त्या अनुषंगाने नवे उद्योग येण्यास तयार झाले आहेत.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील जिल्ह्यातील बंद पडलेल्या काही उद्योगांची धडधड पुन्हा सुरू केली
आहे. नवे उद्योग यावे, यासाठी स्टरलाईटची मोठी जागा एमआयडीसीला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू
आहेत. तसेच जे के फाइल्सची जागेतही नवा उद्योग आणण्याच्या हालचाली सुरू आहे. उद्योगांना सहज
गुंतवणुक कराता यावी, यासाठी राज्य शासनानेही आपले उद्योग धोरण बदलून त्यामध्ये गतिमानता आणली आहे. त्यामुळे सिंगापूर येथील एप्रिल एशिया कंपनी जिल्ह्यात १० हजार कोटींची गुंतवणुक करण्यास तयार झाली आहे. उच्च प्रतिचे टिशू बनविणारी ही कंपनी आहे. हे टिशू विमानात व अन्य ठिकाणी वापरले जातात.
उत्पादनासाठी कंपनीला समुद्र किनारी २ हजार एकर जागेची आवश्यकता आहे. हे टिशू निर्यात केले जाणार
असल्याने बंदराच्या ठिकाणी जागा मिळाल्यास त्याला कंपनी अधिक प्राधान्य देणार आहे. हा प्रकल्प आल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. एमआडीसीच्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा
दिला.