समुद्रात तुफान, मासेमारी ठप्प; बहुतांश नौका किनाऱ्यावर

खोल समुद्रात पाण्याला करंट; मासळीचा प्रचंड तुटवडा

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वारे वाहत आहेत. तसेच बदललेल्या वातावरणाचा परिणाम खोल समुद्रात पाण्याला करंट बसत आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला असून, २० ते २५ टक्के नौकाच समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. या नौकांना चांगला दर मिळवून देणारी मासळी मिळत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये सुरमई, पापलेट, सरंगा महागले आहेत. फिश मिल कंपन्यांना विकली जाणारी छोटी मासळी बर्‍यापैकी मिळत आहे. मात्र, या मासळीचे दर कंपनीकडून 40 ते 50 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. त्यामुळे मासेमारीचा प्रारंभ फारच दयनीय आहे.

रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला असून, जिल्ह्यात साडेचार हजार पेक्षा अधिक यांत्रिकी मच्छिमार नौका आहेत. यामध्ये सुमारे 280 पर्ससीननेट नौका आहेत.
पर्ससीननेट मासेमारी 1 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. परंतु मागील आठवडा भरापासून समुद्रातील वातावरण खराब झाले आहे. बंगालच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने नौका बंदरात च उभ्या आहेत. रविवार पासुन पर्ससीन मासेमारी सुरू झाली. मात्र, पावसाळ्यानंतरची नौकांची आवश्यक ती दुरुस्ती वेळेत होऊ शकली नाही. आर्थिक अडचणीमुळे खलाशी आणि तांडेल नौका मालकांना आणता आले नाहीत. या तांडेल आणि खलाशांना नौकांवर आणण्यापूर्वी आगाऊ रकमा द्याव्या लागतात. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांमुळे पर्ससीन नौका अद्यापही बंदरावराच उभ्या आहेत.

१ ऑगस्ट पासून फिशिंग करणाऱ्या बोटी सुरू झाल्या. या नौकाना सुरुवातीला चांगला रिपोर्ट मिळाला. चींगळ, गेजर, पापलेट, सुरमई याचा रिपोर्ट बऱ्यापैकी होता. मात्र ऑगस्टच्या अखेरीला बदललेल्या वातावरणाचा मोठा फटका मासेमारी व्यवसायाला बसला. मागील आठवडाभरापासून बोटींना रिपोर्ट नसल्याने मच्छीमार आर्थिक संकटात आहेत. बाजारात देखील मासळी नसल्याने मासळीचे दर गगनाला भिडले आहेत. बारीक मासळी मिळाली तरी नौकांचा रोजचा खर्चही निघेनासा झाला आहे. मासेमारीमध्ये ही शुक्लकाष्ट सुरु असतानाच गेल्या आठवडा भरापासून समुद्रात जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे पारंपरिक आणि पर्ससीननेट मासेमारीला काहीशी खीळ बसली आहे. सुमारे २० टक्के नौकाच मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत. धोका नको म्हणून बहुतांश मासेमारी नौका बंदरातच उभ्या आहेत.