रत्नागिरी:- दोन महिन्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या ३ मध्यम प्रकल्पांपैकी एक आणि ६० लघु प्रकल्पांपैकी ४६ प्रकल्प १०० टक्के भरुन वाहू लागले आहेत. गड नदी मध्यम प्रकल्पात गतवर्षी एवढाच यावर्षी पाणीसाठा कमी आहे. एकुण लघुप्रकल्पांपैकी सात प्रकल्प नादुरुस्त असल्याने त्यात यंदा साठा करण्यात आलेला नाही.
जिल्ह्यात नातूवाडी, गड नदी आणि अर्जुना हे तीन मध्यम प्रकल्प आहेत. या तीनही प्रकल्पांचा एकूण निर्मित साठा ४६६.४२ दशलक्ष घनमीटर इतका आहे, तर उपयुक्त साठा ४४४.१२ दशलक्ष घनमीटर इतका आहे. आतापर्यंत या तीनही धरणांमध्ये ३५१.३३ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा आहे. गतवर्षी या तीनही मध्यम प्रकल्पांमध्ये मिळून एकूण ३६९.९२ इतका पाणी साठी २३ जुलैअखेर होता. नातूवाडी प्रकल्पात गेल्यावर्षी उपयुक्त पाणीसाठा २०.२५ दशलक्ष घनमीटर होता. यंदा तो १८.३८ दशलक्ष घनमीटर आहे. गड नदी प्रकल्पात गतवर्षी उपयुक्त पाणीसाठा ६६.३८ दशलक्ष घनमीटर होता. यंदाही तेवढाच पाणीसाठा आहे, तर अर्जुना प्रकल्पात गेल्यावर्षी उपयुक्त पाणीसाठा ७२.५६ दशलक्ष घनमीटर इतका होता. शंभर टक्के साठा यंदाही आहे. नातूवाडी प्रकल्पात गेल्यावर्षीपेक्षा कमी पाणीसाठा आहे. जिल्ह्यात ६७ लघुप्रकल्प असून त्यापैकी १६ लघुप्रकल्प पाटबंधारे विभागाचे आहेत. उर्वरित पाटबंधारे विभागाचे आहेत. त्या ६७ लघुप्रकल्पांपैकी सात प्रकल्प नादुरुस्त असल्याने त्यात यंदा साठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे यंदा ६० लघुप्रकल्पांमध्ये पाणीसाठ्याचा संचय केला आहे. त्यापैकी ४६ धरणे पूर्णपणे भरलेली आहे. गतवर्षीही यावेळी ही धरणे १०० टक्के भरली होती. १ जुनपासून २४ जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरी १८५२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत २८६१ मिमी सरासरी नोंद झाली होती. तुलनेत कमी पाऊस झाला असला तरीही धरणांसाठी पुरक ठरला आहे.