पाळीव कुत्र्यांची शिकार; बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी
रत्नागिरी:- शीळ येथील बौद्धवाडीत पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळला आहे. दोन ते तीन दिवसांपासून बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना होत आहे. तसेच वाडीतील पाळीव प्राणी गायब होताना दिसत आहेत. बिबट्या घरात घुसून पाळीव प्राण्यांची शिकार करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने संचार करणाऱ्या बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बिबट्या वाडीत प्रवेश करताच मध्यरात्री वाडीतील कुत्रे एकाच वेळी भुंकत असून, सैरावैरा पळत सुटतात. यापूर्वी बिबट्याने गावातील कुत्रे फस्त केल्याचे बौद्धवाडीमधील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मजगाव भागातही काहींना बिबट्याचे दर्शन झाल्याचे बोलले जाते.
गेले चार ते पाच दिवसांपासून शीळ बौद्धवाडीमधील अमित कांबळे, संदेश पवार यांच्या घरातील पाळीव कुत्रे गायब झाले आहे. बिबट्या घरात घुसून पाळीव प्राण्यांची शिकार करीत आहे. त्यामुळे एखाद्या ग्रामस्थावरही सहज हल्ला करू शकतो. त्यामुळे वनविभागाने वेळीच सावध भूमिका घेऊन बौद्धवाडीच्या जंगल भागातील परिसरात पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी बौद्धवाडीतील ग्रामस्थ राकेश पवार यांनी केली आहे.