शीळ धरणात शहराला महिनाभर पुरेल एवढा पाणीसाठा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरवासीयांनी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. पाणी टंचाई अधिक गडद होऊ नये, यासाठी पालिकेने एप्रिलमध्ये नियोजन करून दिवासाआड पाणी पुरवठा सुरू केला. शीळ धरणात अजून ०.५३३ दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. हा साठा पुढील ३० दिवस पुरेल असा पालिकेचा दावा आहे.

शहरात आजही काही भागात टंचाईची स्थिती आहे. दिवसाला टॅंकरच्या १० ते १२ फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पालिकेनेही मागेल त्याला टॅंकर देण्यास दिला सुरूवात केली आहे. शीळ धरणात असलेला पाणीसाठा सध्याच्या परिस्थितीत पुरेसा असल्याचे पालिकाकडून सांगण्यात येत असले तरी झाडगाव, जोशी पाळंद, साळवी स्टॉप परिसरात पाणी नसल्याची नागरिकांकडून ओरड होत आहे.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस शहराला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला. शहरातील अनेक पाणीपुरवठा करणाऱ्या खासगी विहिरीदेखील आटल्या आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची भिषणता दिसत आहे. शहराला सुमारे साडेदहा हजार नळजोडणीधारकांना दिवसाला १८ ते २० एमएलडी पाणी पुरवले जाते. आता दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असल्याने एका दिवसाची बचत होते. शहरातील नागरिकांना दररोज पाणीपुरवठ्याची सवय आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा केला तरी तो मुबलक केला जातो; मात्र अनेक अपार्टमेंट किंवा काही भागातून वारंवार पाण्याची मागणी होते. त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नियमित पाण्याव्यतिरिक्त सुमारे ६० हजार ते लाख लिटर पाण्याचा जादा पुरवठा शहरात करावा लागत आहे. शहरातील वरच्या भागात सर्वांत जास्त पाण्याची मागणी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ४.३७३ दशलक्ष घनमीटर एवढी आहे; परंतु आजमितीला शीळ धऱणात ०.५३३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. दिवसाआड पाणी देत असल्याने पुढील ३० दिवस हे पाणी पुरेल एवढा हा साठा आहे.