मंत्री उदय सामंत; खचणाऱ्या डोंगरापासून होणार धरणाचे संरक्षक
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरवासीयांना पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरण आणखी मजबूत होणार आहे. अतिवृष्टीमध्ये धरणाच्या सांडव्याच्याबाजूचा काही भाग खचला होता. त्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला. खचत असल्याने डोंगराचा भाग संरक्षित करण्यासाठी संरक्षक भिंत बाधण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला. तसा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत त्याच्या प्रयत्नाने १४ कोटीचा हा प्रस्ताव मंजूर झाला आहे.
मंत्री उदय सामंत यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली. शहरापासून साडेसहा किमी लांब असलेल्या शीळ धरणावरून रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा केला जातो. शीळ नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाचे हे धरण असले तरी रत्नागिरी पालिकेने भाडेतत्वावर ते घेतले आहे. महिन्याला सुमारे साडेपाच लाखाचा पाण्याचा कर पालिका पाटबंधारे विभागाला भरते. धरणाची पाणी साठ्याची क्षमता ४.३१७ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. शहराला दिवसाला सुमारे १८ एमएलडी पाणी पुरवठा या धरणातून केला जातो.
शीळ धरणामुळेच उन्हाळ्यात रत्नागिरीची तहान भागते. परंतु गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये शीळ धरणाच्या सांडव्याच्या बाजूने असलेला डोंगर खचत आहे. सांडव्यातून धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होतो. परंतु भविष्यात डोंगर खचून सांडव्यामध्ये मलबा आला तर धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाने या धरणाचे सर्व्हे करून धरण अधिक मजबूत आणि सुरक्षित व्हावे, यासाठी डोंगराच्या बाजूनी संरक्षण भिंत उभारण्याचा १४ कोटीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागान शासनाकडे पाठवला होता. मंत्री सामंत यांनी याचा पाठपुरावा करून शीळ धरणासाठीच्या संरक्षण भिंतीचा १४ कोटीचा प्रस्ताव शासनाने मंजूर केल्याचे सांगितले.