शीळ धरणाच्या मजबुतीकरणासाठी १४ कोटीचा प्रस्ताव

 खचणाऱ्या डोंगराच्याबाजूने उभी केली जाणार संरक्षक भिंत

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरवासीयांना पाणीपुरवठा करणारे आणि पाण्यावर पालिकेचे १०० टक्के आरक्षण असलेले शीळ धरण आणखी मजबूत आणि सुरक्षित होणार आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमध्ये धरणाच्या सांडव्याच्या बाजूचा काही भाग खचला होता. त्यामुळे धरणाला काही अंशी धोका निर्माण झाला. दरवर्षी थोडा थोडा भाग खचत असल्याने तो डोंगराचा भाग मजबूत  करण्यासाठी संरक्षक भिंत बाधण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्यासाठी १४ कोटीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

साडेसहा किमी लांब असलेल्या शीळ धरणावरून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जातो. शीळ नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. पाटबंधारे विभागाचे हे धरण असले तरी रत्नागिरी पालिकेने भाडेतत्त्वावर ते घेतले आहे. महिन्याला सुमारे साडेपाच लाखाचा पाण्याचा कर पालिका पाटबंधारे विभागाला भरते. विशेष म्हणजे या पाण्यावर १०० टक्के अधिकार पालिकेचा आहे. ते अन्य दुसऱ्या कोणत्याही वापरासाठी आरक्षित नाही. धरणाची पाणीसाठ्याची क्षमता ४.३१७ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. लाखाच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी शहराला दिवसाला सुमारे २० एमएलडी पाणीपुरवठा या धरणातून केला जातो. पानवल, नाचण्यातील तलाव सोडले तर पाणीपुरवठ्याचा सर्वांत जास्त भार शीळ धरणावर आहे.
शीळ धरणामुळेच उन्हाळ्यात रत्नागिरीची तहान भागते; परंतु गेल्या काही वर्षांपासून होणाऱ्या अतिवृष्टीमध्ये शीळ धरणाच्या सांडव्याच्या बाजूने असलेला डोंगर खचायला सुरवात झाली आहे. सांडव्यातून धरणातील अतिरिक्त पाण्याचा विसर्ग होतो; परंतु भविष्यात डोंगर खचून सांडव्यामध्ये मलबा आला तर धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाने या धरणाचे सर्व्हे करून धरण अधिक मजबूत आणि सुरक्षित व्हावे यासाठी डोंगराच्या बाजूंनी संरक्षण भिंत उभारण्याचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने तयार केला आहे. सुमारे १४ कोटींचा हा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने त्याला दुजोरा दिला.