शाळा सुरू करण्याबाबत प्रशासनाने फेरविचार करावा: ना. सामंत

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असले तरीही भविष्यात दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून परिस्थितीचा विचार करुन शाळा सुरु करण्यासाठी पुनर्विचार करावा अशा सुचना जिल्हाधिकार्‍यांना करणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, जिल्ह्यात शाळा सुरु झाल्याचा आढावा घेतला असता पालकांकडून कमी प्रतिसाद मिळल्याचे पुढे आले आहे. हरयाणामध्ये शेकडो विद्यार्थी कोरोना बाधित झाले होते. अशी परिस्थिती निर्माण झाली तर प्रशासन त्यांची कशी काळजी घेणार हा प्रश्‍न आहे. शासनाने जिल्हा प्रशासनावर जबाबदारी दिली आहे. शिक्षकांच्या कोरोना चाचणीत 7 जणं बाधित आले आहेत. हे प्रमाण कमी आहे. मुलांना शाळेत पाठवायची मानसिकता नसेल, शिक्षक बाधित आढळत असतील तर जिल्हा प्रशासनाने शाळा सुरु करण्याची घाई करु नये. महाराष्ट्रात दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांनीही शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे सध्या शाळा सुरु करण्याची घाई करु नये. थोडा वेळ घेऊनच हा निर्णय घेतला गेला पाही. प्रशासनाने पुनर्विचार करावा यासाठी

जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहे. कोरोनावरील लस येणार असून त्याचे नियोजनही झालेले आहे.
गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात रत्नागिरीकरांनी संयम ठेवला होता. दिवाळीत प्रचंड गर्दी झाली. परंतु अजुनही कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात आहेत. सध्या तरी लॉकडाऊन करण्याचा विचार नाही. पण नागरिकांनी संयम ठेवला पाहीजे. दिल्ली, अहमदाबादप्रमाणे परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन सामंत यांनी केले.