वेगवान वाऱ्यांनी रोखली मासेमारीची वाट

रत्नागिरी:- गेले पाच दिवस समुद्र किनारी भागात वाहणार्‍या वेगवान वार्‍यांनी गिलनेटसह छोट्या होडीतून होणारी मासेमारी थांबली आहे. दुपारनंतर वार्‍याचा वेग वाढत असल्याने हे मच्छीमार समुद्रात जात नाही. सध्या मोठ्या मच्छीमारांनी नौकांना बांगडा, म्हाकुळ मासा मिळत आहे.

कोकणासह राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठवडाभर वातावरणात वारंवार बदल होत आहेत. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र सकाळी आणि सायंकाळी किनारी भागात वारे वाहत आहेत. त्यामुळे गिलनेटने मासेमारी करणार्‍यांची अडचण झाली आहे. वार्‍यामुळे समुद्रात जाण्यासाठी छोट्या फायबर बोटींना इंधन अधिक लागते. तुलनेत मासे मिळत नाहीत. त्यामुळे तोटा सहन करावा लागतो. फायदा होणार नसल्याने मच्छीमारांनी बंदरावर थांबणेच पसंत केले आहे. मोठ्या मच्छीमारांना बांगडा मिळत असल्याने 70 ते 80 रुपये किलो दर मिळत आहे. तुलनेत गिलनेटने पकडून आणलेल्या बांगड्याला अर्धाच दर मिळतो. अपेक्षित दर मिळत नसल्याने गिलनेटवाले मच्छीमार निराश झाले आहेत. काही दिवसांपुर्वी म्हाकुळ मासा मोठ्या मच्छीमारांच्या जाळ्याला लागत आहे. सध्या त्याचा आकार छोटा असल्यामुळे पुढील वर्षी म्हाकुळ मासा तितकासा मिळणार नाही अशी भिती मच्छीमारांकडून वर्तविली जात आहे. महाराष्ट्रच नव्हे तर अन्य राज्यातही यंदा बांगडा मोठ्याप्रमाणात मिळत आहे. त्यामुळे दरही यथातथाच आहेत.