आठ ठिकाणी कृत्रिम तलाव, दोन ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र
रत्नागिरी:- येणाऱ्या गणेशोत्सव कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रनप प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.जयस्तंभ येथे गणेशमूर्ती संकलन केंद्र उभारले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी दिली.
दीड व पाच दिवसांच्या घरगुती गणपतींच्या विर्सजनाकरीता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येईल. यामध्ये माळनाका जीम , कै. प्रमोट महाजन क्रिडा संकुल , लक्ष्मीचौक गार्डन गाडीतळ, शाळा क्र.17 निवखोल, नरहर वसाहत उद्यान, जोगळेकर कॉलनी उद्यान, छत्रपतीनगर उद्यान, नुतननगर उद्यान, विश्वनगर उद्यान या ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच देवज्ञ भवन, नाचणे तलाव, मच्छीमार्केट झारणी रोड या ठिकाणच्या नैसर्गिक तलावात देखील विसर्जनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
कोणत्याही कारणास्तव गणेश मुतींचे विसर्जन करण्यास बाहेर पडत नसणाऱ्या नागरीकांच्या गणेश मुर्तीचे घरोघरी जाऊन संकलन केले जाणार असल्याचे नगराध्यक्ष साळवी यांनी सांगितले. गणेश मुर्त्या घरोघरी संकलित त्यांचे निश्चित स्थळी विसर्जन करण्याचे नगरपरिषदने ठरविले आहे. दीड दिवसांच्या गणेश मुर्तीचे विसर्जन करण्याकरीता 22 ऑगस्ट पर्यंत व पाच दिवसांच्या गणेशमुर्तीचे विसर्जन करण्याकरीता 26 ऑगस्ट पर्यंत सायं 5.00 वाजेपर्यंत नगरपरिषदेच्या 02352-222310 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करण्याची व्यवस्था केली आहे.
याशिवाय मारुती मंदीर व जयस्तंभ या ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे. एकावेळी एका घरातील केवळ दोन व्यक्तींनाच विसर्जनाला जाण्याची अनुमती असून यावेळी मास्क वापरणे बंधनकारक असल्याचे नगराध्यक्ष साळवी यांनी सांगितले.