खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत असगणी येथील कंपनीत बेकायदेशीरपणे जमाव करत केलेल्या राड्याप्रकरणी १५ हून अधिक जणांवर येथील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कंपनीच्या सुरक्षारक्षकाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. असगणी येथे कंपनी उभारण्याचे काम सुरू आहे. या कंपनीत स्थानिक तरुणांना सामावून न घेता परप्रांतीयांना स्थान दिले जात असल्याचे निदर्शनास आले. यानंतर संतप्त शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीत घुसून परप्रांतीय कामगारांना हुसकावून बाहेर काढत काम बंद पाडले होते. यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही धारेवर धरण्यात आले होते. स्थानिकांना सामावून घेण्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत काम सुरू करू देणार नाही, अशी तंबी शिवसेनेने कंपनीला दिली होती. या प्रकारानंतर कंपनीचे कामकाज चार दिवस बंद होते. दरम्यान, बेकायदेशीरपणे जमाव करत कंपनीत घुसून शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार कंपनीच्या सुरक्षारक्षकाने पोलिस ठाण्यात दिली. यामुळे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकारानंतर बंद असलेले कंपनीचे कामकाज गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोलिस करीत आहेत.