रानटी अळंबी खाल्ल्याने मुर्शी येथील नऊजणांना विषबाधा

साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी येथील नऊजणांना रानटी अळंबी खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. बाधा झालेल्या सातजणांवर साखरपा येथे उपचार सुरू असून दोघांना रत्नागिरी येथे हलवले आहे.
 

मुर्शी येथील काही तरुण रविवारी संध्याकाळी रानातील अळंबी आणण्यासाठी गेले होते. त्यांनी आणलेल्या या अळंब्यांची घरी भाजी करण्यात आली. ती खाल्ल्यावर सर्वांनाच पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यातच उलट्या आणि जुलाबही होऊ लागल्याने या सर्वांना साखरपा येथील डॉक्टर विद्याधर केतकर यांच्याकडे नेण्यात आले. त्यांच्या सल्ल्याने सर्वांना प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. शरद भिंगार्डे (वय ६५) चिन्मय भिंगार्डे (१९), रत्नकांत भिंगार्डे (६०),सुधाकर भिंगार्डे (५५), अरविंद भिंगार्डे (७१, अंजना भिंगार्डे (५४), आशिष भिंगार्डे (२१), सुमती भिंगार्डे (९०), शिल्पा भिंगार्डे (४०) अशी विषबाधा झालेल्यांची नावे आहेत. यापैकी सुमती भिंगार्डे आणि शिल्पा भिंगार्डे यांना रत्नागिरी येथे हलवण्यात आले आहे. उर्वरित सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बाधा झालेल्यांना डॉक्टरांनी तपासले असता जंगली अळंबी खाल्ल्यामुळे ही विषबाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले. अळंबी नीट साफ न केल्याने ही विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.