19 ला उद्घाटन; लातूर, कोल्हापूरमधून पशू आणणार
रत्नागिरी:-विकेल ते पिकेल या राज्य शासनाच्या धोरणांतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादीत होणार्या हापूसच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी रत्नागिरीत 19 ते 21 मे या कालावधीत रत्न महोत्सव होणार आहे. यामध्ये शेतकर्यांना मार्गदर्शक ठरतील असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच लातूर, कोल्हापूर, सोलापूर येथून आणलेले पशूही शेतकर्यांना पाहता येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले. या महोत्सवासाठी 45 लाखाचा खर्च अपेक्षित असून जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद कृषी विभागासह आमदार फंडातून निधीची तरतूद केली जाणार आहे.
रत्नागिरीत प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे 19 ते 21 मे या कालावधीत आयोजित केलेल्या रत्न कृषी महोत्सव व पशुपक्षी प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. बी एन पाटील यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. याप्रसंगी जिल्हा कृषी अधिक्षक सुनंदा कर्हाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. पाटील म्हणाले, आंबा उत्पादक आणि बचत गटांच्या विविध उत्पादनांना थेट ग्राहक उपलब्ध करुन देण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणार आहे. त्यादृष्टीने नियोजन केले असून शेतकर्यांना सेंद्रीय शेतीविषयक मार्गदर्शन परिसंवादही आयोजित केला आहे. तसेच हापूसच्या हंगामात अनेक पर्यटक रत्नागिरीत येतात. त्यांच्यासाठी स्वतंत्र मार्केट उभारण्याबाबत विचार केला जाईल. हापूस विक्रीसाठी प्रत्येक जिल्ह्यात आंबा विक्री केंद्र उभारण्यात येणार आहे. पालकमंत्री अॅड. अनिल परब आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत सुचना केली आहे. लवकरच याचे नियोजनही केले जाणार आहे.
महोत्सवासंदर्भात श्रीमती कर्हाडे म्हणाल्या की, महोत्सवाला 45 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हा नियोजनमधून दहा लाख, जिल्हा परिषद पशु विभागाकडून 10 लाख आणि आमदार फंडातून उर्वरित निधीची तरतूद केली जाणार आहे. यामध्ये मंडणगडच्या टोकापासून शेतकरी सहभागी होणार आहेत. पशु प्रदर्शनात येणार्यांना वाहतुकीची सुविधा प्रशासनाकडून दिली जाणार आहे. दर्जेदार पशु लोकांना पाहता यावेत याची सोय करण्यात आली आहे.