रत्नागिरी पालिकेची १० कोटी घरपट्टी वसुली

१४ कोटींपैकी ७५ टक्के वसुली; १२२ मालमत्ता जप्त, २१६ नळजोडण्या तोडल्या

    रत्नागिरी:- घरपट्टी वसुलीसाठी पालिकेने कठोर पावले उचलाल्यामुळे मार्चअखेर सुमारे १० कोटी म्हणजे ७५ टक्के कर वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन टक्क्याने जास्त वसुली झाली आहे. या वसुली मोहिमेत १२२ मालमत्तांवर जप्तीची आणि २१६ नळजोडण्या तोडण्याची कारवाई पथकाने केली आहे. उर्वरित काही कोटीत शासकीय वसुली आहे. यामध्ये बीएसएनएल आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाची मोठी थकबाकी आहे. ही थकबाकी वसुलीची मोहीम अशीच पुढे सुरू राहणार आहे.

    रत्नागिरी पालिकेच्या हद्दीमध्ये सुमारे 30 हजार इमलेधारक आहेत. या इमलेधारकांकडून १४ कोटी घरपट्टी वसुली केली जाते. कोरोना काळातील थकबाकी धरून यंदा १४ कोटी कर वसुलीचे उद्दिष्ट पालिकेसमोर आहे. कर वसुलीसाठी पालिकेने इमलेधारकांना सुरवातीला नोटिसा काढाल्या. त्यानंतर रिक्षा फिरवून ध्वनीक्षेपकावरून सूचना आणि इशारा दिला. अनेक करदात्यांनी घरपट्टी भरलेली नाही. आर्थिक वर्षातील हा अखेरचा महिना संपत आला तरी अजून ५० टक्के घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पालिकेसमोर आहे. या वसुलीसाठी ८ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकांकडून मार्चअखेर १४ कोटींपैकी १० कोटी वसुली झाली आहे.

    अत्यावश्यक सेवेमुळे शासकीय कार्यालयांवर कारवाई नाही

    उर्वरित वसुलीमध्ये शासकीय कार्यालयांची थकबाकी अधिक आहे. त्यापैकी अनेकांना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत; परंतु अत्यावश्यक सेवा असल्यामुळे कारवाई करण्यात आलेली नाही. यामध्ये बीएसएनएल कंपनीची १२ लाखाची तर जिल्हा शासकीय रुग्णालयाची १८ लाखाची थकबाकी आहे. यापुढेही ही वसुली कायम राहणार असल्याचे वसुली पथकाने सांगितले.