रत्नागिरी जिल्हा परिषदेतील रिक्त पदांच्या भरतीला अखेर मुहूर्त

रत्नागिरी:- गेल्या कित्येक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या भरती साठी जिल्हा परिषदेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. एकूण 18 संवर्गातील 715 विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला 5 ऑगस्टपासून प्रारंभ झाला आहे. 25 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आहे.

जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांच्या भरतीसाठी तरूणांचे लक्ष लागले होते. त्याचबरोबर रिक्त जागांमुळे प्रशासकीय कामकाज चालवताना अनेक अडचणी येत होत्या. शेवटी शासनाने यावर गंभीर विचार करत भरती प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 5 ते 25 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत ठेवण्यात आली होती. परिचरसाठी आयबीपीएस या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. भरतीच्या अनुषंगाने आवश्यक ती सर्व कार्यवाही पूर्ण झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, महाविद्यालय या परीक्षेच्या बैठकीचे नियोजन करण्यात येणार आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेच्या सात दिवस आधी प्रवेशपत्र उमेदवारांना प्राप्त होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात पदनिहाय संगणक परीक्षेच्या एकाच तारखेला होणार असल्याने उमेदवारांनी एकाच पदाकरिता अनावश्यक जास्त जिल्हा परिषदांमध्ये अर्ज करू नये. असे केल्यास अर्ज चुकल्यापोटी उमेदवारांचा अनावश्यक खर्च होईल, असे शासनाने कळवले आहे.
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी 1 हजार रूपये, मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रूपये, माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी प्रवेश प्रक्रिया शुल्क माफ असणार आहे.