रत्नागिरी:- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सावानिमित्त कैद्यांना शिक्षेत विशेष सवलत देण्याची योजना केंद्र शासनाने अंमलात आणली. तसे अध्यादेश राज्यातील सर्व कारागृहांना मिळाले. रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहात सर्वच्या सर्व १९० कैदी या योजनेला अपात्र ठरले आहेत. यामध्ये चांगली वर्तणूक व निम्म्याहून अधिक शिक्षा भोगलेल्या पन्नाशीच्या महिला व तृतीयपंथी कैद्यांच्या शिक्षेत टप्प्याटप्प्याने कपात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर साठी उलटलेल्या पुरुष व दिव्यांग कैद्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील या योजनेअंतर्गत हा निर्णय घेण्यात आला. शिक्षा भोगल्यानंतर केवळ दंड भरण्यासाठी पैसे नसल्याने अनेक कैदी तुरुंगात आहेत. अशा कैद्यांनाही सवलतीचा लाभ दिला जाईल. निकषात बसणाऱ्या कैद्यांना तीन टप्प्यात १५ ऑगस्ट २०२२, २६ जानेवारी २०२३ आणि १५ ऑगस्ट २०२३ ला मुक्त करण्यात येणार आहे, असे गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना कळवले आहे. निम्मी शिक्षा भोगलेले व चांगले वर्तणूक असलेले ६० वर्षांवरील पुरुष कैदी, ७० टक्क्याहून अधिक दुर्बल असलेले दिव्यांग तसेच ५० वर्षांवरील महिला, तृतीयपंथी कैद्यांची या योजनेअंतर्गत सुटका केली जाणार आहे. प्रशासन व पोलिस अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय समितीने सखोल तपासणी केल्यानंतर कैद्याची सुटका करण्यावर विचार केला जाणार आहे. निम्मी शिक्षा भोगलेल्या ज्या कैद्यांनी वयाच्या १८ ते २१ वर्षादरम्यान गुन्हा केला आहे व त्यांच्याविरुद्ध दुसरा कुठलाही गुन्हा नाही त्यांनाही विशेष सवलत देण्याबाबत विचार केला जाणार आहे, असे गृह मंत्रालयाने सांगितले आहे.
रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहामध्ये १९० कैदी असून, त्यामध्ये ७ महिला आहेत. बहुतेक कैदी सवलत नसलेल्या कायद्यानुसार शिक्षा भोगत आहेत. त्यामुळे ते केंद्र शासनाच्या या योजनेला अपात्र ठरत आहेत.