रत्नागिरी:- मागील काही दिवसांपासून रत्नागिरीत जोरदार पाऊस सुरु असल्याने पाणी टंचाई दूर झाली आहे. नगर पालिकेकडूनही पाणी पुरवठा नियमित सुरु झाला असून सोमवार 1 जुलै रोजी देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावे असे आवाहन नगर पालिकेने केले आहे.
पाणी टंचाईमुळे मे महिन्यात एक दिवस आड पाणी पुरवठा शहरात करण्यात येत होता. मात्र जून महिन्यामध्ये जोरदार पडलेल्या पावसामुळे शीळ धरण भरुन वाहू लागले आहे. मोठा पाऊस पडत असल्याने काही प्रमाणात नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारीही होत आहेत. त्यामुळे शीळ जॅकवेल आणि साळवीस्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या देखभाल दुरुस्तीसाठी सोमवार 1 जुलै रोजी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नगर पालिकेने घेतला आहे. त्यामुळे सोमवारी पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.