रत्नागिरी:- गणेशोत्सवात चाकरमान्यांचा परतीचा प्रवास प्रचंड खडतर होत आहे. एकीकडे रेल्वेला गर्दी तर दुसरीकडे सीएनजीच्या तुटवड्यामुळे इच्छितस्थळी पोहचताना चाकरमान्यांना प्रचंड कष्ट घ्यावे लागत आहेत.
गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामध्ये काही चाकरमानी आपल्या खाजगी वाहनाने तर काही रेल्वे, एसटीने आपल्या गावी आले आहेत. सोमवारी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत.
परतीच्या प्रवासाला लागलेल्या चाकरमान्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. एकीकडे रेल्वेला प्रचंड गर्दी तर दुरीकडे सीएनजी गॅसचा तुटवडा. रत्नागिरी शहरांमध्ये असलेले सीएनजी पंपावरती मंगळवारी सकाळपासून मोठ्याच्या मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. त्यामध्ये जास्त प्रमाणात रिक्षांची संख्या होती. काही पंपावर तर सीएनजी शिल्लक नाही, त्यामुळे रिक्षाव्यवसायिकानाही सीएनजी करिता आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला. सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे रिक्षा चालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या समस्येकडे कोणी लक्ष देणार आहे का ?असा प्रश्न विचारला जात आहे.