रत्नागिरीत व्हीआयपी दौऱ्यात प्रथमच ड्रोन कॅमेऱ्याद्वारे हालचालींवर नजर

भाजप जनआशीर्वाद यात्रा; रत्नागिरी पोलिसांची नियोजनबद्ध कामगिरी यशस्वी 

रत्नागिरी:- जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा निर्विघन पार पडला असला तरी यामागे रत्नागिरी पोलिसांची नियोजनबद्ध कामगिरी महत्वाची ठरली आहे. ना. राणे यांना अटक झाल्यानंतर जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा संवेदनशील समजला जात होता. मात्र रत्नागिरी पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने हा दौरा हाताळला. प्रथमच व्हीआयपी दौऱ्यात ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला होता. 

जनआशिर्वाद यात्रेतील वादग्रस्त विधानामुळे ही यात्रा राज्यभर चर्चेत आली होती. ना.नारायणराव राणेंच्या अटकेनंतर राज्यभरात सेना – भाजपात संघर्ष सुरु असतानाच शुक्रवारी केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे यांनी पुन्हा रत्नागिरीतून आपली जनआशिर्वाद यात्रा सुरु केली. कोकण हे ना.राणे यांचे होमपिच. राजकीय संघर्षानंतर पुन्हा ना. राणे रत्नागिरीत येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना रत्नागिरी पोलीसांनी केलेल्या बंदोबस्ताच्या नियोजनबद्ध आखणीमुळे ना.राणेंच्या रत्नागिरी, लांजा, राजापूर येथीळ दौऱ्याला क्षणभरही गालबोट न लागता दौरा अतिशय  सुरळीत पार पडला. 

पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी केलेले नियोजन दौऱ्यांच्या यशस्वीततेचे फळ आहे. मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्यावर ना.राणे यांनी केलेली टिका, त्यानंतर महाड पोलीसांनी ना.राणे यांना केलेली अटक व त्यानंतर राज्यभरात सुरु झालेल्या भाजप – सेना संघर्ष या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापलेले असतानाच ना. राणे पुन्हा जनआशिवार्द यात्रेसाठी रत्नागिरीत दाखल होणार होते. त्यामुळे राज्यातील राजकीय पक्षांसह प्रसिद्धीमाध्यमांचे या दौऱ्याकडे लक्ष लागले होते. राज्यभरात राजकीय धूमशान सुरु असताना हा दौरा कसा होतो याची चर्चा राज्यभर सुरु होती. ना.राणे यांच्या नव्या दौऱ्याचे नियोजन झाल्यानंतर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी आपले सहकारी रत्नागिरीचे उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे , पोलीस निरिक्षक सर्वश्री श्री. शिरीष सासने ( वाहतूक शाखा ), श्री. विनित चौधरी ( रत्नागिरी ग्रामीण ) यांच्यावर नियोजनाची जबाबदारी दिली. दोन दिवसात तीन अधिकाऱ्यांनी केलेले नियोजन त्यामध्ये डॉ. गर्ग यांनी दिलेल्या सूचना, याची संयुक्तरित्या केलेली अंमलबजावणी हेच दौऱ्याच्या यशामागील खरे गमक आहे. 

ना.राणे यांच्या दौऱ्याचे नियोजन करताना पोलीसांनी सर्व प्रथम दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने – सामने येणार नाहीत यांची दक्षता घेतली होती. दोन्ही पक्षातील काही निवडक पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या होत्या. शहरात संचलन करुन पोलीसांनी सर्वसामान्य नागरिकांमध्येहि जनजागृती केली होती. तर शुक्रवारच्या मुख्य दौऱ्याकडे पोलीसांचे अधिक लक्ष होते. सकाळी ७ वाजल्यापासून ना.राणे सिंधुदुर्गकडे जाईपर्यंत कोणता पॉईट कुठे आहे, तेथे कोण अंमलदार आहे, त्या स्पॉटवर नेमके काय सुरु आहे हे पहाण्यासाठी दोन मोबाईल व्हॅन तर होत्याच मात्र यावेळी प्रथमच व्हिआयपी दौऱ्यात पोलीसांनी शहरातील हालचाली टिपण्यासाठी ड्रोनचा वापरही केला होता.
 

पोलीस अधीक्षक डॉ.मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक जयश्री देसाई, उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, पोलीस निरिक्षक सर्वश्री श्री. शिरीष सासने ( वाहतूक शाखा ) , श्री. विनित चौधरी ( रत्नागिरी ग्रामीण ) यांच्यासह १४ पोलीस अधिकारी, १३२ पुरुष अंमलदार तर ४३ महिला अमलदार, दोन दंगा काबू पथक, एसआरपीफच्या दोन तुकड्या, क्युआरटी पथक असा पोलीसांचा फौजफाटा तैनात होता. दोन्ही पक्षांची कार्यालये, दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांची कार्यालये, घरे येथेही बदोबस्त ठेवण्यात आला होता. ना.राणे यांच्या दौरा कालावधीत ज्याचा संबंध त्या वास्तूशी आहे, तोच तेथे जाईल असे चोख नियोजन पोलीसांनी केले होते. वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक श्री . शिरीष सासने यांनी ना.राणे यांच्या दौऱ्यातील ताफ्याचा मार्ग निश्चित करताना शहरात कुठेही वाहतुक कोंडी न होता तसेच सेना – भाजप कार्यकर्ते आमने – सामने येणार नाहीत याची पुरेपूर दक्षता घेतली होती. महामार्गावर वाहतूक कोंडी होणार नाही याचेही नियोजन करण्यात आले होते. त्यामुळे ना.राणेचा दौरा विनाविघ्न पार पडला.