रत्नागिरीत जमावबंदी धाब्यावर बसवत नागरिक रस्त्यावर 

शहरात तौबा गर्दी ;बाजारातील खोदाईने हाल

रत्नागिरी:-विकेण्ड लॉकडाऊनची संचारबंदी संपल्यानंतर आज जमावबंदीला शहरात नागरिकांनी तौबा गर्दी गेली. वाहनांसह नागरिकांची प्रचंड वर्दळ दिसत होती. निर्बंध घातलेली दुकाने बंद असली तरी पाढव्याच्या आदल्यादिवशी खरेदीला मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेर पडले. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे नियम अक्षरशः धाब्यावर बसविल्याचे दिसले. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणांकडून डोळेझाक झालेली दिसली.

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने घालुन दिलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच सोमवार ते शुक्रवार दिवसभर जमावबंदी आहे. अत्यावश्यक सेवांनांच परवानगी दिली आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी गर्दी होऊन संसर्ग वाढत असल्याने शनिवार, रविवार विकेण्ड लॉकडाउन करण्यात आले. दोन दिवसात नागरिकांनी याला उत्सफुर्त प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवेची तुरळक वाहने पाहिली तर अन्य सर्व बंद होते. रस्ते, बाजारपेठा, रिक्षा स्टॉप, टपर्‍या आदी ओस पडले होते. विकेण्डच्या दोन दिवसाची कडक संचारबंदी झाल्यानंतर आज आजपासून लागू झालेल्या जमावबंदीला नागरिकांनी फाटा दिला.

उद्या गुढीपाढवा असून परवापासून पुन्हा आठ किंवा चौदा दिवसाचे लॉकडाउन होणार आहे. त्यामुळे आज जमावबंदीचे आदेश धुडकावत नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली. निर्बंध घातलेली दुकाने बंद होती. तरी इतर खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले होते. वाहनांची देखील मोठी वर्दळ होती. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत होती. एकुण जमाबवंदीच्या आदेशाची अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणाने याकडे डोळेझाक केल्याचे दिसत होते. मात्र ही गर्दी पुन्हा कोरोना संसर्गाला कारणीभूत ठरू नये, अशीच प्रतिक्रिया अनेकजण देत होते.