रत्नागिरीच्या महिला संघाची उपांत्य फेरीत धडक

राज्य खो-खो स्पर्धा; अपेक्षा, आरती, श्रेया चमकली

परभणी:- कै. प्रा. यु. डी. इंगळे (बाबा) स्मृती करंडक पुरुष व महिला गटाच्या ५९ व्या राज्य अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महिला गटात रत्नागिरीच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून त्यांच्यापूढे पुणे संघाचे आव्हान आहे. तर दुसरा सामना धाराशिव विरूध्द ठाणे होणार आहे. पुरुषांमध्ये मुंबई उपनगर वि. सांगली आणि ठाणे वि. पुणे अशा लढती होतील.

श्री शिवाजी महाविद्यालयाच्या कै. प्रा. सुरेश जाधव क्रीडानगरीत रविवारी सकाळी झालेल्या चुरशीच्या सामन्यात मुंबईने ठाणे विरुद्ध मध्यंतरापर्यंत कडवी लढत दिली. ८-७ अशी निसटती आघाडी मिळालेल्या ठाण्याने मध्यंतरानंतर बहारदार खेळी करत १९-१५ असा विजय साकारला. ठाण्याकडून संकेत कदम याने आक्रमणात सहा गडी बाद करीत १.२० मिनिटे संरक्षणाची खेळी करीत अष्टपैलू कामगिरी केली. आकाश तोग्रेने (२.०० व १.५० मि.) संरक्षणाची बाजू सांभाळली. मुंबईच्या वेदांत देसाई (२ मि. संरक्षण व २ गुण) शुभम शिगवण (१.४० व १.३० मि. संरक्षण) यांचे प्रयत्न अपुरे पडले.

पुरुषांच्या अन्य तिन्ही लढती एकतर्फी झाल्या. पुण्याने सोलापूरवर १४-८, सांगलीने नाशिकवर १२-१०, मुंबई उपनगरने धाराशिववर १३-१२ असे डावाने विजय मिळविले. महिला गटात धाराशिवने सांगलीवर १२-६ अशी मात केली. त्यांच्या ऋतुजा खरे हिने आपल्या धारदार आक्रमणात सात खेळाडू टिपले. अश्विनी शिंदे (३.१० व ४.२० मि. संरक्षण) हिने दोन्ही डावात संरक्षणाची भक्कम बाजू सांभाळली. सांगलीकडून सानिका चाफे (३, १.३० मिनिटे संरक्षण व २ गुण ) हिने अष्टपैलू खेळ करीत एकाकी लढत दिली. महिलांच्या इतर सामन्यात ठाण्याने नाशिकला १०-८ असे ५.२० मिनिटे राखून नमवले. पुण्याने मुंबई उपनगरवर १२-७ तर रत्नागिरीने सातारावर १०-५ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला. सातारा संघाने सोलापूरला पराभूत केल्यामुळे रत्नागिरीपुढे मोठे आव्हान होते; मात्र शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अपेक्षा सुतार, आरती कांबळे यांच्यासह राष्ट्रीय खेळाडू श्रेया सनगरे, पायल पवार या चौकडीने संरक्षणासह आक्रमणातही चांगला खेळ केला. आरती कांबळेने पहिल्या आक्रमणात सातार्‍याच्या प्रमुख दोन खेळाडून सूर मारुन बाद केल्याने मोठी आघाडी घेतली. अपेक्षाने 4.50 मिनिटे संरक्षण, श्रेयाने 3.40 मि. नाबाद, 4.30 मि असे संरक्षण करत 2 गुण, पायलने 2.50 मि. संरक्षण करत 1 गुण, माधवी बोरसुतकरने 1.30 मि. नाबाद खेळ करत 1 गडी बाद केला. त्यांना दिव्या पालये, गायत्री भोसले आणि साक्षी डाफळे यांनी प्रत्येकी एक गुण मिळवत विजयात मोलाची कामगिरी केली. हा सामना 1 डाव 5 गुणानी (10-5) जिंकत उपांत्य फेरी गाठली.