रत्नागिरीची जनता विकासावर प्रेम करणारी: ना. सामंत

रत्नागिरी:- रत्नागिरीची जनता विकासावर प्रेम करणारी आहे. सर्वसामान्यांचा नेता काय असतो हे आता सर्वांना कळलं असेल. ५००-१००० लोकांत बोलायचं अशी ही आमची सभा नाही, ही विक्रमी सभा आहे, असे सांगत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर नाव न घेता जाहीर टीका केली.

राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर पहिल्यांदाच रत्नागिरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. न भूतो न भविष्यती अशी सभा रत्नागिरीकरांनी शुक्रवारी पाहिली. सार्‍याच सभांचे विक्रम या सभेने मोडीत काढले. या सभेला झालेल्या गर्दीवरुन सर्वच वक्त्यांनी विरोधकांवर टीकास्त्रं सोडले.

रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी मोजक्यांच शब्दांत आपले भाषण केले. मात्र सामंतांच्या प्रत्येक वाक्यावर शिवसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. सत्तापरिवर्तनानंतर रत्नागिरीत पहिल्यांदाच अशी विक्रमी सभा पार पडली. यावेळी बोलताना ना. उदय सामंत यांनी आपल्यावर प्रेम दाखवणार्‍या कार्यकर्त्यांचे जाहीर आभार मानले.

गुवाहाटीचा सांगितला किस्सा

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच पालकमंत्री उदय सामंत यांनी २४ जून पहाटे पावणेपाच वाजता एकनाथ शिंदे यांचा फोन आला. त्यानंतर आपण गुवाहाटीला कसे गेलो? याचा किस्सा सांगितला आणि सभास्थळी हशा पिकला. गुवाहाटीवरुन आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मी उद्योगमंत्री झालो.

मातोश्रीचे नाव न घेता टीका

यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभेला झालेल्या गर्दीवरुन मातोश्रीचे नाव न घेता टीका केली. या गर्दीने ज्यांच्यापर्यंत जे पोहोचायचं असेल ते पोहोचलं असेल. रस्त्यावरील बांधावर बसून भाषण ऐकणारे ही गर्दी पाहून उद्या कदाचित वेगळा निर्णय घेतील, असा चिमटादेखील ना. सामंत यांनी यावेळी काढला.

ही कॉर्नर सभा नाही तर जाहीर सभा

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आदित्य ठाकरे रत्नागिरी दौर्‍यावर आले होते. त्यांनी साळवी स्टॉप येथे जाहीर सभा घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यंाच्यावर टीका केली होती. मात्र आपल्या भाषणात ना. सामंत यांनी नाव न घेता आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. ५००-१००० लोकांमध्ये येऊन बोलायचं अशी ही आजची सभा नाही. तर विक्रमी सभा आहे. आजवर झालेल्या सर्वच सभांमध्ये हा नवा विक्रम असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

बदनाम करण्याचा प्रयत्न

यावेळी बोलताना ना. सामंत पुढे म्हणाले की, आजवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायमस्वरुपी बदनाम करण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरू आहे, त्या व्यक्ती कोण? हे सारं माहित आहे. मात्र सर्वसामान्यांचा नेता कसा असतो? हे आता सर्वांना कळलं असेल.

फक्त बाळासाहेबांची शिवसेना

लांजा येथील माजी नगराध्यक्षांसह सर्व माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर तोच धागा पकडत पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, कोणी कितीही वल्गना करो, जिल्ह्यात फक्त बाळासाहेबांचीच शिवसेना राहील.