रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज होणाऱ्या विक्रमी वाढीपासून अखेर सुटका मिळाली आहे. मागील 24 तासात जिल्ह्यात 390 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. सोमवार वगळता अन्य दिवशी रुग्णसंख्येत झालेली ही मोठी घट आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील दिलासा मिळाला आहे. तसेच जिल्ह्यात आज 876 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील काही दिवसात जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आता पर्यंतचे सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण जिल्ह्यात सापडू लागले आहेत. दररोज पाचशेपेक्षा अधिक जण कोरोना बाधित होत आहेत. नव्याने आलेल्या 390 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 235 रुग्ण आरटीपीसीआर तर 155 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 25 हजार 239 जाऊन पोहचली आहे.
मागील चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाने तब्बल 16 रुग्णांचा बळी गेला असूूून जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 754 इतकी आहे. चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक 11 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.98 % आहे. जिल्ह्यातील कोरोनामुळे वाढणारा मृत्यूदर चिंताजनक आहे. जिल्ह्यात आज 876 जण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत एकूण 18394 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 72.87% आहे.
मागील चोवीस तासात 671 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असून आतापर्यंत एकूण 1,33,173 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील आज सापडलेल्या 290 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 142, दापोली 29, खेड 18, गुहागर 22, चिपळूण 26, संगमेश्वर 74, राजापूर 43 आणि लांजा तालुक्यात 36 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोना संक्रमित होण्याचे प्रमाण 15.93% आहे.