रत्नागिरी:- राज्यात गोवरच्या साथीचा उद्रेक झालेला असतानाच चिपळूण तालुक्यात मागील महिन्यात एक बालक गोवरने आजारी असल्याचे आढळून आले होते. ते बालक मुंबईतून चिपळुणात आले होते. त्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभाग सतर्क झाला असून बालक राहत असलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर परिसरात अन्य कोणाला गोवरची लाग झाली आहे का, याचे सर्वेक्षण आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच राज्य मुंबई, भिवंडी, मालेगाव व अन्य शहरांमध्ये गोवरचा उद्रेक झाल्याने राज्यातील आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. शासनाने राज्यभरातील आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. रत्नागिरी जिल्ह्यातही आरोग्य यंत्रणेकडून गोवरबाबत सतर्कता बाळगण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाभरातील गोवर संशयित २२ बालकांचे नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी मुंबईतून आलेल्या बालकाला गोवर झाल्याचे स्पष्ट झाले असून, अन्य २१ बालकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तरीही आरोग्य विभाग जिल्ह्यात गोवरबाबत सतर्क आहे. सध्या जिल्ह्यात गोवरचा एकही रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश बालकांना नवव्या महिन्यातच गोवरचे लसीकरण करण्यात येते. वेळीच करण्यात येत असल्याने गोवरचे नाहीत. जिल्ह्यातील ८,९५३ बालकांना गोवरची लस दिलेली आहे. मात्र, गोवरने आजारी असलेले बालव मुंबईतून आलेले आहे. तरीही आरोग्य विभागाकडून सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.