उद्योगमंत्र्यांचे आदेश; मच्छीमारांच्या समस्या घेतल्या जाणून
रत्नागिरी:- नैसर्गिक बंदर म्हणून ओळखल्या जाणार्या मिरकरवाडा बंदरात वर्षानुवर्षे बंद अवस्थेत उभ्या असलेल्या मच्छीमारी नौका बाहेर काढण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मत्स्य विभागाच्या अधिकार्यांना दिल्या आहेत.
मिरकरवाडा बंदरातील मच्छीमारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शनिवारी (ता. १७) सायंकाळी मंत्री सामंत यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी सोहेल साखरकर, नुरा पटेल, विकास सावंत, रोशन फाळके, ओंकार मोरे व मच्छिमार बांधव उपस्थित होते. मिरकरवाडा बंदराच्या नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित कामासाठी निधीची आवश्यकता आहे. याबाबत सातत्याने मच्छीमारांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. याबाबत आढावा घेण्यासाठी मंत्री सामंत यांनी संवाद साधला. बंदरात अनेक जुन्या नौका उभ्या करून ठेवण्यात आलेल्या आहेत. काही नौकांचे अवशेष बुडालेले आहेत. त्या बाहेर काढल्या तर जेटीजवळ नियमित नौका उभ्या करण्यासाठी जागा होऊ शकते. यासाठी मत्स्य विभागाकडून पावले उचलणे आवश्यक आहे. बंदरामध्ये एकाचवेळी नौका उभ्या करताना किंवा समुद्रात मासेमारीसाठी नेताना अनेकवेळा अडचण होते. काहीवेळा नौका बाहेर काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. हे टाळण्यासाठी विनावापर नौका किंवा त्यांचे अवशेष काढून टाकणे गरजेचे असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. त्या नौका काढून टाकण्यासासाठी कार्यवाही करा अशा सूचना मंत्री सामंत यांनी दिल्या आहेत. त्यामुळे मच्छीमारांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर मच्छीमारांशी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवा असेही त्यांनी सूचना केल्या आहेत.