रत्नागिरी:- जिल्हा नियोजन, राज्य शासनाकडून प्राप्त झालेला आणि जिल्हा परिषदेचा सादील असा सुमारे सव्वाशे कोटी रुपयांचा निधी मार्चअखेरपर्यंत खर्ची टाकण्यासाठी जिल्हापरिषदेमध्ये लगीनघाई सुरु आहे. दिवस-रात्र एक करत अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. खर्चाचा ताळेबंद अहवाल सादर करण्यासह ठेकेदारांनी कामाची बिले काढून घेण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे मिनी मंत्रालय गजबजले असून आवारातील परिसरात वाहनांनी गर्दी झालेली होती.
शासनाने योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पब्लिक मॅनेजमेंट फंड सिस्टीम लागू केली आहे. त्यामुळे विकासकामांची बिले 31 मार्चपुर्वी खर्ची टाकावी लागणार आहेत. यापुर्वी मार्च एंण्डिग मे महिन्यापर्यंत सुरु राहत होता. यंदा ती परंपरा खंडित होणार असून 31 मार्च रोजी आर्थिक वर्षाची सांगता निश्चित आहे. शासकीय कामकाजासाठी पाच दिवसाचा कालावधी शिल्लक राहिल्यामुळे सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालये, बँका, पतसंस्थेत अधिकारी व कर्मचार्यांची धावपळ सुरु होती. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, महावितरण, लघु पाटबंधारेसह सर्वच शासकीय कार्यालयाबाहेर दिवसभर अलिशान वाहनांची वर्दळ वाढली होती. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी – तसेच ठेकेदारांची धावपळ सुरु होती. मार्च अखेरमुळे सर्वच कार्यालयांचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू आहे. कोट्यवधी रुपयांचा आलेला निधी विविध योजनांवर खर्च करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सरपंच व ठेकेदार यांची धावपळ सुरु होती. 100 टक्के खर्च करण्यासाठी आणि जास्तीत जास्त फाईल्स हातावेगळ्या करण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.
दरवर्षी विविध शासकीय कार्यालयात मार्च महिना जवळ आला की विविध कामाची पुर्तता करण्याची लगीनघाई अधिकारी व कर्मचारी करत असतात.