माध्यमिक शाळेत होणार निवडणूक साक्षरता मंचाची स्थापना

रत्नागिरी:- मतदार नोंदणीत सक्रियता व लोकशाहीविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी माध्यमिक शालेय पातळीवर निवडणूक साक्षरता मंच स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी नववी ते बारावी इयत्तेत शिकणार्‍या विद्याथ्यार्ंचा सहभाग राहणार आहे. याद्वारे देशाच्या भावी पिढी समोर मतदानाचे महत्व पटवून देण्यात येणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ’मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ या कार्यक्रमाअंतर्गत मंच स्थापन करण्याची शिफारस केली होती. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यात नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेतले जाणार आहे. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी, त्यांच्यात भावी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याविषयी तसेच मतदान करण्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी हा मंच कार्य करणार आहे. या मंचात नववी ते बारावीचे सर्व विद्यार्थी सभासद असतील. प्रत्येक वर्गातून दोन प्रतिनिधींची निवड होईल. या प्रतिनिधींमधून स्थापन कार्यकारी समिती मंचचे काम पाहील.
मंचचे मार्गदर्शक म्हणून निवडणुकीच्या कार्याचा अनुभव असलेल्या शिक्षकाची नेमणूक करण्याची सूचना करण्यात आली आहे. हा शिक्षक जिल्हा निवडणूक अधिकार्‍याने सुचवलेल्या कार्यपद्धतीशी समन्वय साधून विद्यार्थ्यांना विविध संसाधने पुरवण्याची जबाबदारी पार पडणार आहे. उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करणे, भावी मतदारांची कौशल्ये अनुभवातून विकसित करण्यासाठी निवडणूक साक्षरता प्रक्रियेचे आयोजन करणे, मुलांना निवडणुकांसाठी मार्गदर्शन करणे, तसेच नवीन संसाधने निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी या मार्गदर्शक असलेल्या नोडल अधिकार्‍यावर राहणार आहे. २१ ऑक्टोबपर्यंत मंचाची स्थापना करायची असून २६ ऑक्टोबपर्यंत मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी प्रमुखांची माहिती मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना कळवायची आहे.