माता, बालकांच्या सशक्ततेसाठी पोषण महिना अभियान

रत्नागिरी:- माता आणि बालके सुद़ृढ रहावी यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये माता व बालकांना सशक्त करण्यासाठी पोषण महिना अभियान राबविले जात आहे. हे अभियान ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. यामध्ये अभियानांतर्गत जिल्ह्यातील २८७१ अंगणवाड्यांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत हवळे यांनी दिली आहे.

पोषण महिना अभियान सरकारचे महत्त्वाकांक्षी अभियान असून माता व बालकांना सशक्त बनविण्यासाठी त्याचे नियोजन करण्यात आले आहे. महिनाभर चालणारे हे अभियान जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रात राबविण्यात येणार आहे. मातेला पोषक आहार व चांगली आरोग्यसेवा मिळण्यासाठी व त्यांचे योग्यपणे पोषण होण्यासोबतच कुपोषण दूर होण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन कालावधीत हात स्वच्छ धुण्याचे महत्व पटवून दिले जाणार आहे. गावांमध्ये प्रभातफेरी काढून आरोग्य व पोषण विषयक संदेशाचा प्रचार व प्रसार करण्यात येईल. अनेमियामुक्त भारत कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त केलेल्या शाळांच्या नोडल अधिकार्‍यांच्या मदतीने पोषण महिन्यात नियमितरीत्या शाळेतील मुलांना मध्यान्ह भोजन दरम्यान लोहयुक्त गोळ्यांचे वाटप व सेवन होईल असे नियोजन करण्यात येणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये पोषण महिना अभियान कालावधीत कॅम्पचे आयोजन करून विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येईल. तसेच पोषण मोहिमेमध्ये एएनएम आणि आशा स्वयंसेविका या गृहभेटी देऊन जनजागृती करणार आहेत. पोषण महिना अभियान कालावधीमध्ये अंगणवाडी स्तरावर एक समुदाय आधारित कार्यक्रम, ग्राम आरोग्य स्वच्छता पोषण दिवस व बालक संगोपन आधारित पालक मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या समन्वयाने पोषण महिन्यात कुपोषित बालकांच्या व्यवस्थापनासाठी अंगणवाडीस्तरावर ग्राम बाल विकास केंद्राचे आयोजन करावे, तसेच बचत गटाच्या महिला प्रतिनिधींचा प्रभावीपणे सहभाग पोषण मोहिमेमध्ये करण्यात यावा व त्यांच्याद्वारे पोषण अभियान बद्दल जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना श्री. हळवे यांनी दिली.