रत्नागिरी:- जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शंभर टक्के घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. त्यामध्ये 2 हजार 361 सारी आणि इलीचे रुग्ण सापडले आहेत. या रुग्णांमधून 291 कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे.
कोरोना नियंत्रण अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकसंख्येला दोन वेळा भेटी देऊन संशयित कोव्हीड रुग्णांचा शोध घेण्यात आला. 15 सप्टेंबर 2020 पासून माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आली. पहिली फेरी 10 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात आली. त्यामध्ये 15 लाख 42 हजार 612 लोकसंख्या आणि 4 लाख 40 हजार 572 घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी 686 टीममध्ये 2 हजार 029 कर्मचारी कार्यरत होते. या मोहिमेसाठी विविध प्रकारे जनजागृती करण्यात आली आहे. तसेच विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले
आहे.
14 ऑक्टोबर 2020 ते 25 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दुसरा टप्पा घेण्यात आला. यामध्ये 686 पथकांमाफत पुन्हा एकदा जिल्ह्यातील सर्व घरांचे पर्यायाने सर्व लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे.
तपासणी दरम्यान कोमॉर्बीड आजाराचे म्हणजे डायबेटिस, उच्च रक्तदाब, ह्रदयविकार, किडनी विकार इत्यादी प्रकारचे 1 लाख 12 हजार 079 रुग्ण आढळून आले. या मोहिमेअंतर्गत कोरोना रुग्णांचे निदान केल्यामुळे एकापासून दुसर्या व्यक्तीला आजार होण्याची साखळी खंडित करण्यात यश आले. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे.