उपनेतेपदाचा राजीनामा; आज शिंदे सेनेत प्रवेश करणार
रत्नागिरी:- गेल्या काही काळापासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला सोडचिठ्ठी देण्याची चर्चा असलेले माजी आमदार राजन साळवी यांनी अखेर ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. साळवींनी ठाकरेंच्या पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. ते आज दुपारी तीन वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
कोकणात ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे कोकणात ‘ऑपरेशन टायगर’ला सुरुवात झाल्याची चर्चा जोर धरत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोकणातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार राजन साळवी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा काही काळापासून रंगली होती.
भाजपमधील प्रवेशाच्या चर्चेबाबत मात्र साळवींनी थेट बोलणे टाळले होते. ‘मी बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक आहे. त्यांना अभिप्रेत असलेले काम मी आजपर्यंत केले आणि त्यांच्याच विचारांचे काम मी पुढे नेणार आहे,’ असे ते म्हणतहोते. मात्र आता ते शिवसेनेचा झेंडा हाती घेताना दिसत आहेत.
राजन साळवी यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, तीन वेळा आमदार, आता उपनेता अशा विविध पदांवर काम केले आहे. त्यामुळे साळवी यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाल्यास कोकणात महायुतीला मोठे बळ मिळणार आहे.
विधान परिषदेवर संधी?
राजन साळवी यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता असून त्यांना तसा शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. ‘माझ्या पराभवाला कारणीभूत वरिष्ठ मंडळी आहेत. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. जो दुःखाचा डोंगर पक्षावर, माझ्या कुटुंबावर कोसळला, त्याला कारणीभूत कोण हे शोधणं गरजेचं आहे. माझ्यावर जी वेळ आली आहे ती भविष्यात अन्य कोणावर येऊ नये, यासाठी वरिष्ठ नेतृत्त्वाने योग्य निर्णय घ्यायला हवा. पराभवाला कारणीभूत कोण आहे, त्याचा शोध घेतला पाहिजे,’ असं साळवी म्हणाले होते. मात्र आता त्यांच्या पक्षांतराच्या बातमीने त्यांच्या नाराजीला वाट मिळाल्याचे दिसते.