रत्नागिरी:- राजापूर येथे जमीनिच्या वादातून अनुसूचित जातीतील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने 3 वर्षे सश्रम कारावास व 16 हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अनंत मधुसूदन प्रभूदेसाई ( रा तळवडे राजापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध भादंवि कलम 354 (ब) सह अनुसूचित जाती-जमाती कायद्यानुसार राजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तपास करून दोषारोपपत्र ठेवले होते.
रत्नागिरी विशेष सत्र न्यायाधीश एल. ड़ी. बिल्ले यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारी पक्षाच्यावतीने ऍड़ प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार, आरोपी अनंत प्रभूदेसाई व पीडित महिला यांच्यात मागील काही वर्षापासून जमिनीवरून वाद सुरू होता. 30 एप्रिल 2019 रोजी सकाळी 7 च्या सुमारास पीडित महिलेशी वाद असलेल्या जागेतील कुंपण अनंत प्रभूदेसाई त्याचा भाऊ व आई हे तोडत होते. ही घटना पीडित महिलेच्या निदर्शनास येताच तिने आरोपी अनंत याला या बाबत विचारणा केली. कुंपण तोडल्याप्रकरणी विचारणा केल्याचा राग येवून आरोपी अनंत याने पीडितेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच पीडितेची साडी ओढून फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. आरोपीने हातातील काठीने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडितेने राजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.