रत्नागिरी:- महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागात सप्टेंबर महिन्यात वीजबिल महसूल उद्दिष्टाच्या केवळ 79 टक्केच वसुली होऊ शकली. परिणामी तब्बल 661 कोटी रुपयांची वसूली बाकी आहे. सध्याच्या कठीण आर्थिक परिस्थितीत वसुलीअभावी थकबाकीत राहणारी ही रक्कम महावितरणचे संकट अधिक वाढवणारी ठरत आहे.
कल्याण येथे आयोजित कोकण प्रादेशिक विभागातील भांडूप, कल्याण, नाशिक, जळगाव आणि कोकण परिमंडलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. चालू वीज बिल व थकबाकीतील थोडीशी रक्कम (सुमारे 20 टक्के) वसूल करण्याचे दिलेले लक्ष्य म्हणजे संबंधित महिन्याचे वसुलीचे उद्दिष्ट असते. कोकण प्रादेशिक विभागात वाशी मंडल कार्यालय वगळता सप्टेंबर महिन्याच्या वसुलीचे उद्दिष्टउर्वरित 14 मंडल कार्यालयांना पूर्ण करता आलेले नाही. यात पेण, ठाणे, कल्याण एक व दोन, वसई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, मालेगाव, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या मंडल कार्यालयांचा समावेश आहे. याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे यांनी अचूक नियोजन, उपलब्ध मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम प्रभावीपणे राबवून ऑक्टोबर महिन्यात वीज बिल वसुलीचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. याशिवाय अकृषक वीज वापर वाढवणे, वीजहानी कमी करून महसूलात वाढ, ऑक्टोबर हीटमुळे कृषिपंप व इतर ग्राहकांचा वाढता वीजवापर लक्षात घेऊन वितरीत होणार्या प्रत्येक युनिट विजेचे बिलात रुपांतर व त्याची वसुली करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
या बैठकीला भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता कैलास हुमणे, कोकण परिमंडलाचे मुख्य अभियंता विजय भटकर यांच्यासह सर्व मंडल कार्यालयांचे अधीक्षक अभियंते उपस्थित
होते.
आढावा बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार प्रत्यक्ष फिल्डवर काम होते किंवा नाही याची पडताळणी व वसुलीचा आढावा घेण्यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक रेशमे हे स्वत: फिल्डवर राहणार आहेत. या भेटीत वसुलीच्या कामात निष्काळजीपणा करणार्यांवर थेट कारवाई करण्याची पूर्वसूचना त्यांनी दिली आहे. तर महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कर्मचार्यांना वसुलीच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी कोकण प्रादेशिक विभागातील ग्राहकांना केले आहे.