महावितरणकडून 168 ग्राहकांना झटका; थकबाकीमुळे तोडली वीज 

रत्नागिरी:- महावितरणच्या जिल्ह्यातील वीज ग्राहकांची थकबाकी कमी होण्याची लक्षणे नाहीत. जिल्ह्यातील ९६ हजार ६०९ ग्राहकांनी महावितरणचे १५ कोटी २८ लाख रुपये थकवले आहेत. यामध्ये घरगुती ग्राहक सर्वांत जास्त ८४ हजार ७८८ एवढे आहेत. वाणिज्य १० हजार ३२८ आणि औद्योगिक १ हजार ४९३ ग्राहकांचा समावेश आहे. एका महिन्याची थकबाकी असली तरी वीजजोडणी तोडण्याचे आदेश कोकण परिमंडळाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील १६८ थकित ग्राहकांना महावितरणने दणका देऊन त्यांच्या वीज जोडण्या तोडल्या आहेत. मात्र काही ग्राहक लगेच थकबाकी भरत असल्याने हा आकडा कमी, जास्त होण्याची शक्यता आहे.    

कोरोना महामारीमध्ये महावितरण कंपनीपुढे थकबाकीचा डोंगर उभा राहिला. या काळात शासनाने सर्व थरातील नागरिकांना सवलती दिल्या. त्यामध्ये महावितरण कंपनीचे वीजबिल भरण्याबाबतही सवलत देण्यात आली होती. हे बिल माफ होण्याच्या शक्यतेने अनेक ग्राहकांनी बिल भरलेच नाही. त्यामुळे महावितरणची थकबाकी प्रचंड वाढली. कंपनीची आर्थिक घडीच विस्कटून गेली. महावितरण कंपनीवर मोठे आर्थिक संकट आल्यानंतर कंपनीने थकबाकी वसुली सुरू केली. तीन महिन्याचे एकदम बिल काढल्याने ग्राहकांमध्ये संताप झाला. काही राजकीय पक्षांनी याविरुद्ध आंदोलनं केली; मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. अखेर कोरोनातील निर्बंध शिथिल करून परिस्थिती पूर्वपदावर आली तरी महावितरण कंपनीची थकबाकी मात्र कमी होण्याचे नाव घेईना.
जिल्ह्यातील थकबाकी तेव्हा ८४ कोटीच्या वर होती; मात्र थकबाकी वसुलीसाठी कंपनीने कठोर पावले उचलल्याने हळूहळू थकबाकी कमी होत आली. महावितरण कंपनीने वीजबिल जरी एक महिना थकले तरी जोडणी तोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांनी घाबरून थकबाकी भरण्यास सुरवात केली आहे. जिल्ह्यात ९६ हजार ६०९ वीज ग्राहकांची १५ कोटी २८ लाख एवढी थकबाकी आहे. वसुलीसाठी कंपनीने कारवाई सुरू केली.