मतदानाच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश

रत्नागिरी:- मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे यासाठी मतदानाच्या दिवशी मंगळवार 7 मे रोजी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान प्रक्रीया पार पाडली जाणार आहे. मतदान दिवशी जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी आठवडा बाजार भरविण्यात येतो, त्या ठिकाणी मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदान सुरळीतपणे पार पाडावे, याकरिता बाजार व जत्रा अधिनियम 1962 चे कलम 5 (ग) मधील तरतुदीनुसार जिल्ह्यामधील मंडणगड तालुक्यातील देव्हारे, लाटवण, दापोली तालुक्यातील विसापूर, खेड तालुक्यातील भरणे, चिपळूण तालुक्यातील वहाळ, संगमेश्वर तालुक्यातील कडवई, तुळसणी, फुणगुस, वांद्री, रत्नागिरी तालुक्यातील नाचणे, मालगुंड, चांदोर, राजापूर तालुक्यातील कात्रदेवी आणि लांजा येथील 7 मे रोजी आठवडा बाजार बंद  ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.